आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने आपल्या विचारांचा, जनतेशी बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील उंबरगाव, माळेवाडी, भैरवनाथनगर, शिरसगाव येथील विविध विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सुनीता बनकर या होत्या. अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिक िशदे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, हिंमत धुमाळ, उपसभापती कैलास कणसे उपस्थित होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर मुरकुटे यांनी सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असली तरी त्यांनी स्वतंत्र भूमिका निवडणुकीत घेण्याचे संकेत दिले आहेत. मुरकुटे म्हणाले, ससाणे-कांबळे यांनी तालुक्यात ठेकेदारी संस्कृती निर्माण केल्याने गावोगावच्या विकासकामांच्या दर्जावर विपरीत परिणाम झाला आहे. दर्जेदार व टिकाऊ स्वरूपाची विकासकामे होण्यासाठी जनतेची एकजूट आवश्यक असून, या एकजुटीतूनच जनतेचा ठेकेदारावर वचक राहिल्यास ती कामे निश्चितच दर्जेदार होतील. विकासकामे टिकाऊ कसे होतील, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मुरकुटे यांनी केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, सुनीता गायकवाड, शरद नवले, अश्विनी भालदंड, अच्युत बडाख, अर्चना पानसरे, अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते.