तामिळनाडूसारख्या दक्षिणेकडील राज्यात एका छोटय़ा गावातला फारसा न शिकलेला, विद्वान वगैरे नसलेला माणूस उत्तम लेखक होऊ शकतो ही किमया साधली होती तामिळ लेखक मेलनमाई पोन्नुसामी यांनी. साध्या नियतकालिकातून वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास सुरुवात करून त्यांनी त्यांचा वैचारिक दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने सामान्य लोकांचे जीवन साहित्यातून टीपकागदासारखे टिपणारा संवेदनशील लेखक हरपला आहे. पोन्नुसामी हे शेतकरी होते. ते तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्य़ातील मेलानमरैनाडू या गावात किराणा दुकानही चालवीत असत. कम्युनिस्ट पक्षाच्या ‘सेमालार’ या साहित्यविषयक नियतकालिकात त्यांची पहिली कथा १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली. नंतर ‘आनंद विकटन’, ‘काल्की’ या नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. मागणीनुसार लेखन अशा तडजोडी करणाऱ्यांतील ते नव्हते, त्यामुळे त्यांनी कधी शैली व आशयात बदल केला नाही. पोन्नुसामी यांना ‘मिनसारापो’ या लघुकथा संग्रहासाठी २००८ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. एकूण २२ लघुकथासंग्रह, सहा कादंबऱ्या व एक निबंधसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा. तामिळनाडूतील शेतकरी, ग्रामीण भागांतील गरीब लोक यांच्या जीवनाचा पट त्यांनी लेखनातून मांडला. दक्षिण तामिळनाडूतील करीसाल भूमी म्हणजे निम्न कोरडवाहू शेतीच्या प्रदेशातील वंचितांचे जीवन त्यांनी रेखाटले. प्रत्यक्ष अनुभवाची जोड असल्याने त्यांचे लेखन अस्सल बाजाचे होते. ते अवघे पाचवीपर्यंत शिकलेले, पण अनुभव हा त्यांचा गुरू होता. ते पूर्णवेळ लेखक होते. शिवाय ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असत. सोव्हिएत साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता व प्रतिकूलतेत मानवी नातेसंबंधातील मूल्ये कशी बदलत जातात हे त्यांनी लेखनातून दाखवले. छोटय़ा नियतकालिकातील लेखनातून त्यांची वाटचाल ‘काल्की’, ‘आनंद विकटन’ यांसारख्या नावाजलेल्या नियतकालिकांतील लेखनाकडे झाली. सर्व वयोगटांतील सामान्य लोकांशी त्यांचे चांगले जमत असे. स्थानिक विषयांपासून ते आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत कुठलाही विषय त्यांच्या गप्पात वर्ज्य नव्हता. तामिळनाडू पुरोगामी लेखक संघटनेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. सेम्मालारच्या संपादकीय मंडळातही त्यांचा समावेश होता. स्वत:ला ते जाहीरपणे कम्युनिस्ट लेखक म्हणून घेत असत. त्यामुळे त्यांनी त्या विचारसरणीशी असलेले नाते कधी लपवले नाही. तरुणपणापासूनच ते कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षलेि गेले. सोव्हिएत रशियातून आलेल्या पुस्तकांचे तामिळ, हिंदी भाषांतर वाचून त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करण्याची सवय लागली ती कायमचीच. त्यातून ते वंचितांचे दु:ख टिपत गेले. त्यांच्या लेखनात असलेले सामाजिक भान हे अजोड होते, त्यामुळेच लेखक या नात्याने तर ते स्मरणात राहतीलच, शिवाय एक सामाजिक विचारवंत म्हणूनही त्यांचे नाव चिरंतन राहील. लेखकाला समाजमन टिपण्याचे जे कौशल्य असावे लागते ते त्यांच्याकडे होते, त्यामुळे ते प्रभावी लेखन करू शकले. इतर कम्युनिस्ट लेखकांनी आर्थिक पाश्र्वभूमी असलेले लेखन केले असले तरी स्त्रियांच्या व्यथा व वास्तव ही पोन्नुसामी यांच्या लेखनाची आणखी एक प्रेरणा होती. कौटुंबिक चौकटी न मोडताही स्त्रीवाद जोपासता येतो. स्त्री-पुरुष यांचे संबंध मैत्रीचे असू शकतात, असे त्यांचे मत होते. अर्थार्जन हा त्यांच्या साहित्य लेखनाचा हेतू कधीच नव्हता. त्यांच्या प्रत्येक कथेतून वेगळा बंडखोर विचार सामोरा आल्याशिवाय राहात नाही. साहित्य अकादमी पुरस्काराच्या व्यतिरिक्त त्यांना २००९ मध्ये मक्कल टीव्ही पुरस्कार, इलाकिया चिंतनी पुरस्कार, अदिथनार पुरस्कार व तामिळनाडू सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाले होते.