सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासन वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. परंतु, वेळ जात नसल्यामुळे आणि फुकटचे सल्ले देण्याची सवय असल्यामुळे कंत्राटी भरतीवरून अनेक मिम्स समोर यायला लागले आहे. त्यातील समाज माध्यमांवर एक मीम धुकाकूळ घालत आहे. मुलींना कोणता नवरा हवा, हे सांगणारा हा मीम आहे. पण मुलींना कोणता नवरा हवा आणि मुलींना फुकटचे सल्ले देणारे हे लोक कोण ?
राज्य शासन वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय फाडून महायुती सरकारचा निषेध राज्यातील अनेक भागांत होत आहे. अशातच आता कंत्राटी भरतीवरून अनेक मिम्स समोर यायला लागले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक खासगी क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे शासकीय सेवेतील नोकरीच हवी असा एक गैरसमजही पुढे आला. आता शासनाने कंत्राटी भरतीचा धडाका लावला आहे. त्यामुळे ‘‘मुलींनाे कंत्राटी भरतीच्या विरोधात सर्वाधिक संख्येने तुम्ही रस्त्यावर उतरा, अन्यथा तुम्हाला सरकारी नवरा कसा मिळेल’’, असा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे.
हेही वाचा : Asian Games 2023: एकच गाव, एकच आडनाव; भारतासाठी कांस्यपदक मिळवणाऱ्या ‘या’ जिगरबाज मैत्रिणी कोण? जाणून घ्या…
पण, मुलींना सरकारी नोकरीवाला नवरा हवा का ? मुलींना कोणता नवरा हवा हे समाज का ठरवणार ? पूर्वीच्या काळात मुलींना सरकारी नोकरीवाला नवरा हवा, स्वतःचे घर असणारा नवरा हवा, असे समज होते. पण आज समाज बदलला आहे. मुली स्वतः सक्षम आहेत. स्वतःचे अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे. स्वतः नोकरी करून आर्थिकदृष्ट्याही त्या सक्षम आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. विविध क्षेत्रातील मुली आपल्या क्षेत्रातील किंवा ज्याच्यासह त्यांचे विचार जुळतील, जो त्यांना साथ देईल असा मुलगा निवडतात. अगदी घरच्यांच्या पसंतीने लग्न करतानाही मुलगा सरकारी नोकरीतला हवा अशी काही अट नसते. मुलगा कमावता हवा, हे मात्र बघितले जाते. पण आज अनेक मुली स्ट्रगल करणारा मुलगा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करू इच्छिणारा मुलगा असेल तरीही त्याला साथ देतात. नोकरीत बदल होत असतानाही मानसिक आधार मुली देतात. आजकाल तर सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांकडे भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या नोकऱ्या म्हणून बघितले जाते. सरकारी नोकरदार असेल तर त्याच्याकडचा पैसा हा काळा पैसा असणार अशी पाठीमागून चर्चाही होते. आज मुलींचा नवरा शोधतानाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत आहे. त्या नवरा शोधताना त्या ‘पार्टनर’ ‘साथीदार’ ‘जोडीदार’ अशा कल्पना करत आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी हा निकष राहिलेला नाही. सरकारी नोकरीत असणाऱ्या फायद्यांसारखे फायदे आता खासगी कंपन्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपनीतही सुट्ट्या, बोनस आणि अन्य फायदे दिले जातात. त्यामुळे सरकारी नोकरी ही मुलींच्या अपेक्षांची प्राथमिकता राहिलेली नाही. त्यामुळे समाजाने मुलींना कोणता नवरा हवा, हे ठरवू नये.
हेही वाचा : नाश्ता न करणे ठरू शकते कर्करोगाचे कारण ! जाणून घ्या नाश्ता कधी आणि का करावा ?
मुलींना सरकारी नोकरी करणारा नवरा हवा हा मीम अनेक लोक हास्यास्पद घेऊन शेअर करत आहेत. ही हास्यास्पद गोष्ट नाही. मुलींनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे त्याला धक्का पोहोचवणारे आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या मुलीही अन्य क्षेत्रातील जोडीदार बघतात. त्यांना सरकारी नोकरी हा निकषच नसतो. आजच्या मुली तेवढ्या समजूतदार होत आहेत. केवळ काही मुलींना अगदी सरकारी नोकरीतला मुलगा हवा असेल, तरीही त्यावरून सर्व मुलींना बोलण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे, मुलींनी का आंदोलन करायचं ? नवरा मिळावा या साठी आंदोलन करणे आवश्यक आहे का ? ज्या मुलींना सरकारी नोकरीतला मुलगा हवा त्या बघतील काय करायचं ते. त्या साठी मुलींनो आंदोलन केले पाहिजे असे फुकाचे सल्ले देण्याची गरज नाही. मुलींना फक्त सरकारी नोकरीतला मुलगा हवा असता, तर शेतकरी, बँक, खासगी क्षेत्रे, आयटी क्षेत्र, अन्य क्षेत्रातील मुलगे यांचे विवाह कसे झाले असते ? सतत मुलींच्या बुद्धिमत्तेवर बोलायचे, त्यांच्या वागण्यावर बोलायचे, त्यांच्यावर मीम करायचे हे काम नसणाऱ्या लोकांचे धंदे आहेत.