डॉ. स्मिता प्रकाश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विवेक ही मीनल कोण आहे? तिला तू बाहेर भेटायला का बोलावलं आहेस?”

“अगं, ती माझ्या ऑफिसमध्ये आहे.”

“मग ऑफिसच्या कामासाठी बाहेर का भेटायचं आहे?”

“वसुधा, तू माझ्या प्रत्येक गोष्टीत का लक्ष घालतेस? टीव्हीवरच्या मालिका बघून तुला प्रत्येक गोष्टीत संशय यायला लागला आहे.”

वसुधा आणि विवेकची चांगलीच खडाजंगी झाली. दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. खरं तर त्या दिवशी वसुधाचा वाढदिवस होता. विवेक नंतर शांत बसला, पण वसुधाच्या डोक्यातून राग जात नव्हता. तिला एकटीलाच यानं बाहेर भेटायला का बोलावलं? बायकोपासून लपवण्यासारखं असं काय आहे? हेच विचार वारंवार तिच्या मनात येत होते.

त्याचं नक्की काय चाललंय हे शोधून काढायलाच हवं असा विचार मनात येऊन तिच्यातील ‘जासूस’ जागा झाला. तिनं त्याच्या नकळत गुपचूप त्याचा फोन घेऊन भराभर त्यातले मेसेज वाचले. आणि मग ती हा प्रकार वारंवार करू लागली. लपूनछपून त्याचे चॅट वाचणं, सोशल मीडियावरचं स्टेटस चेक करणं यात ती गुंतली. एक दिवस विवेकनं मीनलला लंच टाइममध्ये त्याच्या केबिनमध्ये जेवायला बोलावलं, हा त्याचा मेसेज तिच्या वाचण्यात आला आणि ती खूप संतापली. विवेक मीनलमध्ये अडकलेला आहे याबाबत तिची आता खात्री झाली. ती विवेकला न सांगता तडक माहेरी निघून आली.

वसुधा अशी अचानक कशी आली आणि बॅग घेऊन का आली, हे सरोजताईंना कळेना. ती अस्वस्थ आहे, हे लगेच कळण्यासारखं होतं. शेवटी थोडं थांबून त्यांनीच विषय काढला-

“वसू, तू काहीच बोलली नाहीस तरी चालेल, पण असं धुमसत राहण्यापेक्षा मोकळेपणानं रडून घे. जेव्हा माझ्याशी बोलावंसं वाटेल, तेव्हाच बोल. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझे आईबाबा तुझ्याबरोबर आहेत, हे विसरू नकोस.” आईचं हे वाक्य ऐकून वसुधाचा बांध फुटला, ती अगदी हमसाहमशी रडू लागली. सरोजताईंनी तिला जवळ घेतलं, तिच्या पाठीवर त्या थोपटत राहिल्या. रडण्याचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, “आई, विवेक माझी फसवणूक करतोय. माझा विश्वास त्यानं गमावला आहे. आता हे नातं मला टिकवायचं नाही.”

“वसुधा, त्याचं नक्की काय चालू आहे? आणि तो असा का वागतोय याबाबत तुमचं बोलणं झालंय का?”

“मला त्याच्याकडून काहीच स्पष्टीकरण नको आहे. मी सर्व शोधून काढलं आहे आणि आता या नात्यातून बाहेर पडलेलंच बरं.”

“वसुधा, अगं नात्यात अनेकदा समज-गैरसमज होतात. पण एकमेकांशी बोलायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला हवं. संसार म्हणजे तडजोड असतेच.”

“नाही आई… मुळात संसार म्हणजे तडजोड हेच मला मान्य नाही. तडजोड म्हणजे तुटू नये म्हणून केलेली जोड असते. ती तकलादू असते. पुन्हा केव्हा तडा जाईल ते सांगता येत नाही. विश्वास गमावलेल्या व्यक्तीबरोबर जुळवून घेणं मला जमणार नाही. माझी फसवणूक करणारा जोडीदार मला नकोय.”

सरोजताई तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती काहीही ऐकायला तयार नव्हती. तिला तिचा स्वतःचा वेळ द्यायला हवा असं त्यांना वाटलं आणि त्या म्हणाल्या, “ठीक आहे, मीही याबाबत विवेकशी बोलून घेते आणि मग पुढं कसं जायचं हे ठरवू.”

सरोजताई विचार करत होत्या… शिकलेल्या, स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणाऱ्या, करिअरिस्ट आणि २८ ते ३० या वयात लग्न झालेल्या मुलामुलींची स्वतःची अशी ठाम मत ठरलेली असतात. त्यामध्ये ‘मोल्ड’ होण्याची त्यांची तयारीच नसते. आपल्या काळात वयाच्या २०-२२ व्या वर्षी मुलामुलींची लग्नं व्हायची, त्यामुळे पालकांशी बोलल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नसे. लहान वयामुळे वैचारिक लवचिकता होती. त्यामुळे कदाचित, पण लग्न मोडण्याचं प्रमाण कमी होतं. अनुभवी पालक मुलांना मार्गदर्शन करून मुलांची वाट चुकली तरी पुन्हा वळणावर आणायचे. पण आता मुलं पालकांचं ऐकण्यास तयार नाहीत. काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर पालकांचे विचार मागासलेले आहेत, असं मुलांना वाटत. तरीही मुलांचा संसार तुटणं उघड्या डोळ्यांनी पाहणं सरोजताईंना अवघड होतं, म्हणूनच त्यांनी विवेकशी बोलायचं ठरवलं.

विवेक आल्यानंतर सरोजताईंनी त्याची बाजू समजावून घेतली. मीनल ही विवेकची ‘कलीग’ होती. एकाच प्रोजेक्टवर दोघं काम करत होते. अनेक वेळा त्यांचं जाणं-येणं एकत्र व्हायचं, पण एक सहकारी याव्यतिरिक्त दोघांमध्ये कोणतंही नातं नव्हतं. वसुधाचा वाढदिवस होता, त्या दिवशी त्याला तिला काहीतरी ‘सरप्राईज गिफ्ट’ द्यायचं होतं, म्हणून सल्ला घ्यायला त्यानं मीनलला बाहेर भेटायला बोलावलं. त्याच वेळी वसुधाच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. वाढदिवस होऊन गेल्यानंतर विवेकनं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं, पण तसं त्यानं काहीच केलं नाही. त्यामुळे वसुधाच्या मनात काही गोष्टी तशाच राहिल्या. वसुधानं विवेकच्या नकळत त्याचा मोबाईल तपासायला सुरूवात केली. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप चेक करत राहिली. मीटिंगसाठी मीनलला त्याच्या केबिनमध्ये बोलवायला विवेक तिला मेसेज पाठवायचा. ऑफिसच्या एका कार्यक्रमाचे फोटो त्यानं फेसबुक आणि इन्स्टावर टाकले होते, त्यात ते दोघं शेजारी-शेजारी उभे होते. हे पाहून वसुधाची मानसिकता बिघडली होती. सर्व जमजून घेऊन सरोजताईंनी दोघांना बसवून एकमेकांशी बोलायला लावलं आणि त्यांना समजावलं.

“नात्यात अशी कटुता यायला नको असेल, तर गैरसमज वेळीच दूर करायला हवेत. मनात आलेल्या गोष्टी वेळीच बोलून टाकल्या तर धुमसत राहणं कमी होतं काही वेळेस शाब्दिक चकमकी झालेल्या चालतात, पण धुमसत राहणं चांगलं नसतं. त्यामुळे नात्याला केव्हा सुरुंग लागेल ते सांगता येत नाही. लगेच कोणत्या गोष्टीवरून अनुमान काढणंही योग्य नाही. पूर्वग्रह मनात न ठेवता दूसरी बाजू शांतपणे समजून घेण्याची तयारी दाखवायला हवी. छोट्या छोट्या गोष्टींवरून नात्याला वेठीस धरू नका. तुम्ही दोघं समजूतदार आहात, तुमचे निर्णय घेण्यास सक्षम आहात; पण काही वेळा अनुभवाचे बोलही महत्त्वाचे असतात, याचीही जाणीव ठेवायला हवी!” सरोजताईंचं म्हणणं दोघांना पटलं असावं, कारण दोघांनी डिनरला बाहेर जाण्याचा प्लॅन ठरवला. दोघांच्या हळूहळू गप्पा सुरू झाल्यानंतर सरोजताईंनी तिथून काढता पाय घेतला. पण त्यांच्या चेहऱ्यावर ‘गाडी रुळावर येतेय’ याचं समाधान होतं!

smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keeping misunderstandings in a relationship dangerous cheating divorce ysh
First published on: 20-05-2023 at 11:53 IST