पूजा सामंत

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री. पण ‘पॉकेटमनी’ मिळवण्यासाठी तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच. त्याच वेळी ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे. आता आपण तेलुगू अस्खलितपणे बोलतो आणि वाचूही शकतो, असं अभिमानानं सांगणारी रकुल म्हणते, की ‘भाषेविषयी तिटकारा असता काम नये, प्रेम असावं, की मग सगळं जमतं!’

रकुलचा ‘छत्रीवाली’ हा चित्रपट नुकताच ‘ओटीटी’वर प्रदर्शित झाला. या निमित्तानं झालेल्या मुलाखतीत ती बोलत होती. मूळची पंजाबी बोलणारी असूनही रकुलला दाक्षिणात्य चित्रपटांत सफाईदारपणे काम करणं कसं जमत गेलं, या प्रश्नावर रकुल म्हणाली, “सुरूवातीच्या चित्रपटानंतर मला दक्षिणेतून आणखी नवीन चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली, वेळेवर मानधन मिळत गेलं आणि हे करताना मला मजाही येत होती. भाषेचा अडसर जो सुरुवातीला जाणवला, तो नंतर जाणवला नाही. तमिळ भाषेवर माझं प्रभुत्व नाही, पण मी तेलुगू भाषा मनापासून शिकून घेतली. या भाषेतली पुस्तकं, दैनिकंही मी वाचू शकते. माझ्यासाठी पूर्वी कुणीतरी ‘डबिंग’ करावं लागत असे, तेही आता करावे लागत नाही. मी अस्खलितपणे तेलुगू बोलते. सध्याच्या काळात मनोरंजन क्षेत्र झपाट्यानं बदललं आहे आणि भाषा हा अडसर उरलेलाच नाही. दाक्षिणात्य कलाकारांनी मला सुरुवातीला खूप सांभाळून घेतलं. मी उत्तर भारतीय असल्यानं मला एकटं टाकणं, गॉसिप करणं, असं कधी घडलं नाही. एकूणच मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप चांगला अनुभव आला.”

आणखी वाचा-गुगल डुडलवरती असणारी भारतीय महिला कोण आहे ? कोण होत्या जरिना हश्मी ?

आपल्या कारकीर्दिबद्दल रकुल सांगते, “मला अभिनयात आता १० वर्षं होताहेत. आता एखादी भूमिका संपली आणि ‘लास्ट शॉट’ दिला की त्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणं मला जमू लागलं आहे. ‘आय लव्ह यू’ हा माझा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झाला आहे. त्यात मी ‘सत्या’ ही व्यक्तिरेखा केली आहे. त्यासाठी मला १५ दिवसांचं खास प्रशिक्षण, १५ दिवसांची कार्यशाळा करावी लागली. भूमिका चांगली व्हावी म्हणून मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वत:ला तयार करणं हा त्याचा उद्देश होता. ‘रनवे ३४’ या चित्रपटात मला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर कोर्टरूम ड्रामा शॉट द्यायचा होता. पण तालीम करूनही ऐनवेळी माझ्या तोंडून शब्दच फुटेना! समोर अमिताभ बच्चन आणि माझ्या बाजूला अजय देवगणसारखा सीनियर अभिनेता. अमिताभ बच्चन यांचे मोजकेच दिवस चित्रिकरणाला मिळाले असल्यानं त्या ४ दिवसांत काम संपवायचं होतं. त्यामुळे माझ्यामुळे ‘रीटेक’ होताहेत हे लक्षात आल्यावर मी ओशाळून गेले. रात्रभर मला झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी मी स्वतःहून बच्चन सरांशी थोड्या अनौपचारिक गप्पा मारल्या. ताण हलका करायचा प्रयत्न केला. आणि माझी गाडी रुळावर आली! याच रनवे-३४ साठी मी पायलट ट्रेनिंग देखील घेतलं होतं, तो एक भन्नाट अनुभव होता.”

आणखी वाचा- ‘चांद्रयान-३’मागची रॉकेट वूमन- रितू करिधाल-श्रीवास्तव

१० ऑक्टोबर १९९० चा रकुल चा जन्म. दिल्लीत जन्मलेल्या रकुलचे वडील आर्मी ऑफिसर असल्यामुळे तिला शिस्तबद्ध जीवनाची लहानपणापासून सवय लागली. तिनं दिल्लीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर तिनं गणित हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असल्यापासून तिला मॉडेलिंगसाठी सतत विचारणा होऊ लागली. दरम्यान ‘पॅन्टलून फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत तिला ‘मिस फ्रेश फेस’, ‘मिस टॅलेंटेड’, ‘मिस ब्युटीफूल स्माईल’ आणि ‘मिस ब्युटीफुल आईज’ हे चार पुरस्कार मिळाले होते. ‘पॉकेटमनी’साठीच्या धडपडीतून सुरू झालेली तिची चित्रपट कारकीर्द आता एका अभिमानास्पद टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokwomen.online@gmail.com