भारतीय संघ सध्या एकापाठोपाठ एक विजय मिळवत आहे मात्र त्यादरम्यान होणारा प्रवास त्यांच्या तंदुरुस्तीची परीक्षा पाहणारा आहे. पर्थहून मेलबर्न हा तीन तासांचा प्रवास, त्यानंतर मेलबर्न-ऑकलंड दोन तासांचा विमानप्रवास आणि ऑकलंडहून हॅमिल्टनला जाण्यासाठी अध्र्या तासाचा बसप्रवास असा प्रवास करून भारतीय संघ दाखल झाला. आणि त्यानंतर काही तासांतच त्यांनी अमिरातीचा सामना केला. भारताने हा सामना जिंकला, मात्र असंख्य खेळाडूंची पूर्ण झोपही झाली नसल्याचे धोनीने सांगितले. न्यूझीलंडला येणेजाणे आमच्यासाठी त्रासदायक ठरल्याचे धोनीने सांगितले. उपांत्यपूर्व फेरीत कोणाशी मुकाबला आहे यापेक्षा ऑस्ट्रेलियात परतण्याच्या वेळी झोप घेता येईल अशी व्यवस्था झाल्यास बरे होईल असा टोमणाही धोनीने लगावला.