स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गेल्या दोन वर्षांपासूनची मंदी यंदाच्या दसरा-दिवाळीत नाहीशी होण्याची आशा आहे. घर खरेदीदाराच्या प्रतिसादाची घर विक्रेत्याला प्रतिक्षा आहेच. शिवाय विकासकही नव्या दमाने सज्ज झाला आहे. किरकोळ घर विक्रीबरोबरच या क्षेत्रातील वाणिज्य वापरासाठीच्या जागांचे व्यवहारही वाढण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी रिएल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम गोयल हे स्थावर मालत्ता क्षेत्रातील मोठय़ा स्वरुपातील खरेदी-विक्री व्यवहारातील कंगोरे स्पष्ट करण्यासह एकूणच या क्षेत्रावर प्रकाश टाकतात झ्र्

  • स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदी संपली आहे, असे चित्र समोर आहे, असे मानायचे काय?

या क्षेत्रात अगदीच मंदी होतीे, असे पूर्णपणे म्हणता येणार नाही. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रातील व्यवहार काहीसे संथ होते, एवढेच. त्याला विविध कारणेही होती. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एकूणच अर्थव्यवस्था निस्तेज होती.

 

  • यंदाच्या सणांच्या पाश्र्वभूमीवर काही सकारात्मकता जाणवते आहे काय?

गेल्या काही महिन्यांपासून स्थावर मालमत्ता क्षेत्रातील स्थिती सुधारत आहे, असे निश्चितच म्हणता येईल. अगदीच सांगायचे झाले तर गेल्या दोन तिमाहीपासून खरेदी झ्र् विक्रीबाबतची विचारणा वाढली आहे. गुंतवणूकदारही रस घेऊ लागले आहेत.

 

  • क्षेत्रासाठी अशा कोणत्या पूरक बाबी तुम्ही अधोरेखित कराल?

मुख्य म्हणजे यंदा मान्सून चांगला झाला आहे. त्याचे परिणाम लवकरच प्रत्यक्षात जाणवतील. शिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांनी लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे एक ग्राहकवर्ग क्रयशत्ती विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्मिती तसेच सेवा क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर महागाई सावरल्याचे आकडेही समोर येत आहेत.

 

  • घरांच्या किंमती अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेल्या नाहीत. शिवाय रिक्त घरांची संख्याही वाढतेच आहे. अशा वेळी घर खरेदीदार, गुंतवणूकदार यंदा आकर्षित होण्याबाबत शंका वाटत नाही काय?

घरांच्या किंमती फार काही कमी झाल्या नाहीत. आणि त्यातील वाढही अशी लक्षणीय नाही. यंदाच्या खरेदी मोसमातही किंमती २ ते ३ टक्के वाढीच्या फारशा पुढे जातील असे वाटत नाही. निवारा पुरवठय़ाबाबत म्हणाल तर अशी अतिरिक्त घरे फारशी आहेत, असे नाही. भौगोलिक असमानात त्यात असण्याची शक्यता आहे. मात्र हल्ली परवडणाऱ्या दरातील मागणी लक्षात घेता इथे कुठेच मंदी जाणवत नाही.

 

  • मोदी सरकारच्या विकासाभिमुखतेची लोकप्रियता आटली असल्याचे भाव येथील उद्योगांमध्ये असतानाच या क्षेत्रात मोठे गुंतवणूकदार, विदेशी कंपन्या, अनिवासी भारतीय या क्षेत्राला कितपत पसंती देतील, असे वाटते?

प्रत्येक मंदीचा एक कालावधी असतो. अमेरिकेतील सब प्राईमच्या रुपात २००९ मध्ये जागतिक तिसरे आर्थिक संकट कोसळले. यानंतर २०१२ मध्येही जवळपास अशीच काहीशी स्थिती होती. या प्रमाणे सध्याचा बिकट कालावधी तसा ओलांडला गेला आहे, असे निश्चितच म्हणता येईल. आधी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा एकदा या क्षेत्राकडे वाढला आहे.

 

  • विदेशी किंवा मोठे गुंतवणूकदार स्थावर मालमत्तेबाबत आता कशाला प्राधान्य देत आहेत?

कोणताही गुंतवणूकदार हा त्या गुंतवणुकीत अधिक परताव्याच्या हेतून आपली पूजी त्या पर्यायात लावत असतो. गेली काही वर्षे त्याची रक्कम अडकून पडायची अशी स्थिती होती. आता त्याचा गुंतून रहायचा कालावधी कमी झाला आहे.

व्यवसायातील अनिश्चितता म्हणा अथवा कोणते संकट कधी येईल, यामुळे म्हणा कमी कालावधीकरिता गुंतवणूक करून त्यातून अधिक परतावा घेऊन बाहेर पडण्यास तो उत्सुक आहे. म्हणूनच लवकर तयार होणारे गृहनिर्माण प्रकल्प यांना तो प्राधान्य देत आहे.

 

  • पण मग तशी साथ त्याला विकासक, वित्तसंस्थांकडून मिळते आहे काय?

हो. निश्चितच. प्रकल्प विकासाचे कमी मुदतीचे प्रकल्प हे या गुंतवणूकदारांचे लक्ष्य आहे. तुलनेत कठोर नियामक यंत्रणेमुळे विकासकांनाही कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण करून ते खरेदीदाराच्या ताब्यात देण्यावर भर द्यावाच लागत आहे. बँका, वित्त कंपन्यांकडूनही पूरक सहकार्य विकासकांना मिळत आहे. कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होत आहे.

 

  • एचडीएफसी रिएल्टी ही वाणिज्यिक वापरासाठीच्या खरेदी झ्र् विक्री व्यवहारात अग्रेसर आहे. या बाजुवर कंपनीचे कार्य सध्या कसे आहे?

स्मार्ट सिटीजमुळे गृहनिर्माणबरोबरच वाणिज्यिक वापरासाठीच्या बांधकामाला मागणी आहे. या क्षेत्रात वाढते भाडे ही चिंता असली तरी व्यवसाय विकासाच्या दृष्टीने अनेक कंपन्या अशा व्यवहाराला अधिक महत्व देत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

विशेषत: माहिती तंत्रज्ञान, वाहन, बँक, विमा, वित्त कंपन्या यांच्याकडून वाणिज्यिक वापरासाठीच्या जागेचे व्यवहार अधिक नोंदले जात आहेत. या क्षेत्रात गेल्या तीन ते चार वर्षांचा कालावधी चांगला गेला आहे. मुंबई, पुणे, बंगळुरु, नवी मुंबईसारख्या शहरांमधून या जागांकरिता अधिक मागणी आहे.

  • सहाराच्या मालमत्ता लिलाव प्रक्रियेत एचडीएफसी रिएल्टीही नियोजन करत आहे. याबाबतचे काही टप्पेही पूर्ण झाले आहेत. त्याचा काय प्रतिसाद आहे व या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेतून कंपनीचे काय नियोजन आहे?

सहारा समूहाच्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेत कंपनी तीन ते चार टप्प्यांमध्ये सहभागी होत आहे. यापूर्वीच्या टप्प्याकरिता बोलीधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विविध ३० प्रकल्पांकरिता ५०० हून अधिक अर्ज आले आहेत. यापैकी अनेक मालमत्ता तर निमशहरांमध्ये आहेत. काही शहरे उत्तर भारतातील आहेत. तर काही अगदीच निमशहरे आहेत. मात्र त्यासाठीही रस दाखविला गेला  आहे. या अंतर्गत आतापर्यंत ११० कोटी रुपयांच्या मालमत्तांचे व्यवहार झाले आहेत. कंपनी सध्या २,४३९.५३ एकर जागेच्या लिलाव प्रक्रियेत प्रगतीपथावर आहे. एकूणच ही प्रक्रिया पूर्ण झाली की अंतिम प्रतिसाद अधिक स्पष्ट होईलच.