आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविलेल्या दिग्गजांचे मोठेपण दडलेले असते ते त्यांच्या सर्जनशीलतेत आणि त्यांच्या विचारसरणीत. अशा देशोदेशींच्या थोरामोठय़ांचे विचार जाणून घेऊ या, या मासिक सदरात..
‘आनंददायी घडामोडींनी भरगच्च, पारितोषिकांचा आणि हर्षोल्हासित असा हा एकंदरीत २५ वर्षांचा प्रवास होता.. ’ सुविख्यात इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मूर्ती यांनी सेवानिवृत्तीच्या भाषणाच्या वेळी काढलेले हे उद्गार आहेत. इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांतील जगविख्यात भारतीय कंपनीचे नागवर रामराव (एन. आर) नारायण मूर्ती हे सहसंस्थापक. ध्येयवादाच्या परिपूर्णतेच्या त्यांच्या या उद्गारांमागे असीम आंतरिक तृप्ती झळकते.
१९८१ मध्ये सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीची सुरुवात त्यांनी भारतामध्ये केली. आपापल्या सुविद्य पत्नींकडून १० हजार रुपये उसने घेऊन सात व्यावसायिकांनी एकत्रितपणे सुरू केलेली ही नवी कंपनी होती. व्यावसायिक जगतामध्ये इन्फोसिसने अनेक नवे पायंडे रोवले, अनेक रेकॉर्डस् केले. कॉर्पोरेट प्रशासन आणि पारदर्शकता यांच्या निकषांवर इन्फोसिस कंपनी योग्य कॉर्पोरेट व्यवहाराची आणि स्वच्छ कारभाराचे एक उदाहरण बनले आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी हेरणे हे त्यांचे पहिले श्रेय. कसलेल्या जव्हेऱ्याप्रमाणे नेमकी माणसे हेरणे हे दुसरे श्रेय. त्यापेक्षाही अर्थपूर्ण, सयुक्तिकता म्हणजे, ही बांधलेली मोट टिकवणे. सर्वाना एकत्रित बांधून ठेवणे.. सर्व संस्थापक हे मध्यमवर्गीय पाश्र्वभूमीतून आलेले होते. केवळ आपली बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी इन्फोसिसचे स्वप्न साकार केले. क्षितिजापल्याड जाणाऱ्या भारतीय बिझनेसच्या आलेखाचे हे विद्यमान शतकातील अनुकरणीय मॉडेल ठरले आहे.
जाणून घेऊ या, या बिझनेस गुरूचे तसेच जीवन-गुरूचे मौलिक विचार –
‘इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात साधी फोन लाइन मिळवणे किंवा पहिला संगणक मिळवणे हादेखील एक अवघड, प्रदीर्घ असा प्रवास झाला असताना.. सुरुवातीपासून आम्हाला हे फार स्पष्ट होते की, इन्फोसिसचे कार्य हे भारतातर्फे या क्षेत्रामध्ये मौलिक योगदान करण्याचे आहे. १९९० च्या दरम्यान आमची स्थिती डळमळीत झाली होती. तेव्हा इतर देशांमधून आमची कंपनी विकत घेण्याच्या ऑफर्स येत होत्या. आणि आम्ही सहसंस्थापक चर्चा करीत होतो. चार-पाच तासांच्या प्रदीर्घ चच्रेनंतर एक प्रकारचा विषाद आणि नराश्य यांनी मन भरून गेले. तत्क्षणी निर्णय घेऊन मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले की, ‘काळजी करू नका, मीच ही कंपनी विकत घेतो. मला हे ठाऊक आहे की, या देशात हे सगळं अवघड आहे परंतु पुढे जाऊन आपल्याला नक्कीच प्रकाश सापडेल.’ काही मिनिटांतच सर्व जण मला म्हणाले, ‘ आम्ही तुमच्या बरोबर आहोत. यानंतर कधीही आपण ही कंपनी विकण्याचा, थकण्याचा, प्रयत्न सोडण्याचा किंवा तत्सम दुसरा कुठलाही विचार करायचाच नाही.. आपली घोडदौड पुन्हा एकवार नव्याने सुरू करूया..’
‘.. अशक्य वाटते तेच शक्य करणे म्हणजेच नेतृत्व होय. प्रतीत होणाऱ्या वास्तवाच्या चित्राचे पुनर्आकलन ही लायक नेतृत्वाची खुबी असते. खराब रस्ते, प्रदूषण, वाईट ट्रॅफिक इत्यादी गोष्टी या भारताचे वास्तव असतीलही.. आपण जसे घडवतो, तसे वास्तव घडते. बदल हा आपल्या हातात असतो. तुम्ही लोकांना केवळ आत्मविश्वास दिलात तर ते अचाट गोष्टी साध्य करू शकतात.
तत्पर मनोभूमिका असली की, सुसंधीदेखील पुरेपूर माप पदरात टाकते. आमच्या टिकाव धरण्याच्या ठाम निश्चयानंतर लगेचच उदारीकरणाचा ठराव आला आणि त्याचा पुरेपूर फायदा इन्फोसिसला झाला.
वैयक्तिक सोयी-सुविधांसाठी कॉर्पोरेट संसाधनांचा वापर कधीही न करणे, प्रत्येक व्यावसायिकाचा उचित आदर ठेवणे इत्यादी कठोर कॉर्पोरेट प्रशासकीय तत्त्वांच्या आधारे, अत्यंत व्यावसायिक दृष्टी ठेवून जगातील इतर कुठल्याही कॉर्पोरेटसारखी, आम्ही ही कंपनी चालवली.
मी बुद्धीने भांडवलशहा आणि हृदयाने साम्यवादी आहे. बिझनेस व्यवस्थापनामध्ये आदर कमावणे हे नफा वाढवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. परिश्रमांच्या राजयोगावर मी कायमच जास्त भर देईन. मी  कायमच सांगत आलो की, शंका असेल त्या वेळी नेहमीच ती व्यक्त करा. विचारक्षमता आणि मनोभूमिका किंवा धारणा (mind and mindset) यांच्यातील फरक हा प्रगतीचे मानांकन निर्देशित करीत असतो.
ग्रामीण लोकांची प्रगती साध्य करून त्यांना चांगले जीवनमान, योग्य वेतन, आरोग्य, आहार आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी आपल्याला कमी स्तरावरील तंत्रज्ञानापासून उत्पादनाची सुरुवात करून नंतर चीनसारखेच मोठय़ा प्रमाणावर हायटेक (उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून) उत्पादन करावे लागेल, असे मला वाटते. सहृदयता बाळगून भांडवलशाही तत्त्वांचे उपयोजन करणारा मी एक व्यापारी आहे. आíथक उलाढाली करताना, आहे ती स्थिती धरून ठेवण्यावर मी विश्वास ठेवत असलो तरी सामाजिक बाबतीत मोकळ्या मनोवृत्तीचा मी स्वीकार करतो. एवढे असूनही साम्यवादाच्या, समाजवादाच्या गुंगीत राहणे मला मान्य नाही. लोकांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून भांडवलशाही जर उपलब्ध करून द्यायची असेल तर दारिद्रय़ात पिचत पडलेल्यांबद्दल कमालीची सहृदयता-करुणा बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की, लायकी नसलेल्यांना नोकऱ्या द्या किंवा कमी नफा काढा परंतु, जिथे, जेव्हा आणि जसे शक्य आहे, तसे करुणामय आíथक-सामाजिक वर्तन ठेवणे हे गरजेचे आहे. पशांचे खरे सामथ्र्य हे देऊ करण्यातले सामथ्र्य असते.
कामे करताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. यासाठी एक मार्गदर्शक कार्यसूत्री मी देतो-
*    सकाळी उठा. चांगली न्याहारी घ्या आणि कामाला जा.
*    आठ ते नऊ तास चलाखीने, हुशारीने, परंतु जीव तोडून मेहनत करा.
*    घरी जा.
*    कॉमिक्स वाचा. मजेशीर चित्रपट पाहा. चिखलात-मातीत काम करा किंवा मुलांशी खेळा.
*    पुन्हा योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
मी याला पुनíनर्माण असे म्हणतो. वरीलपकी १, ३, ४ आणि ५ या पायऱ्यांच्या काटेकोर पालनामुळे पायरी क्रमांक २ ही सार्थरीत्या साध्य होते. नियमित तास कामे करणे आणि दररोज पुनíनर्माण करणे या सोप्या संकल्पना आहेत. आपल्यातील काही जणांना त्या फार कठीण वाटतील कारण, त्यासाठी व्यक्तिगत बदल करण्याची त्यांना गरज आहे. या पर्यायांची निवड करण्याचे सामथ्र्य आपल्यापाशी असल्यामुळे हे करणे शक्य आहे. आपल्या अनुपस्थितीत बरेच काही ‘घडणारे’ हातातून निसटण्याची भीती कर्मचाऱ्यांना असते. तुम्ही झोपी गेलेले असताना काही ना काही घडेलच, परंतु, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि घडलेल्याच्या तालात पुन्हा कसरत करण्याची कृती अनुसरावी लागते. त्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा ही जागे झाल्यानंतर तुमच्यापाशी असते.  
कंपनीची शाश्वत मालमत्ता ही रोज संध्याकाळी कंपनीच्या दरवाजातून बाहेर पडते. ती सर्वच्या सर्व संपत्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी परत येत आहे ना, याची आपण पुरेशी खातरजमा केली पाहिजे.
परमेश्वरावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे. इतरांनी मात्र कामकाजाचे सर्व तपशील (टेबलवर) नीटपणे सादर करावेत. हे कायम ध्यानात असू द्या की, अत्यंत स्वच्छ, पारदर्शी सत्-असत्विवेक ही जगातील अत्यंत मऊशार उशी आहे. कामगिरी ही ओळख मिळवून देते. ओळख आदर मिळवून देते. आदर आणखी जास्त बळकटी तसेच सामथ्र्य देतो, सामथ्र्यवान कारकिर्दीच्या प्रत्येक क्षणामध्ये माणुसकीची चाड आणि दैवी अस्तित्वाचे भान हे संस्थेला नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवून देते.
सरतेशेवटी सर्व काही वैयक्तिक मूल्ये आणि नीतिमत्तेपाशी येऊन ठेपते. दीर्घ कालखंडाचा विचार करता, उत्तम कार्य आणि कार्यवाही करणाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी सजग राहिले पाहिजे. आजच्या तरुण पिढीने पशाला प्राधान्य देऊन सामथ्र्यवान वाटून घेण्यापेक्षा सौजन्य, प्रामाणिकपणा आणि आदर ही अक्षय संपत्ती जवळ बाळगली पाहिजे.’नारायण मूर्ती यांच्या व्यवसायविषयक अभिनव दृष्टीचा आजच्या तरुण पिढीने कित्ता गिरवला पाहिजे.