कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. कोकणात ग्राम बालविकास केंद्र, बाल उपचार केंद्र व पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी कालबद्ध उपाययोजना करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील ०-६ वर्षांतील सर्व मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रथम स्तरामध्ये अंगणवाडी सेविकेमार्फत तर द्वितीय स्तरामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या सर्वेक्षणासाठी १११ उपकेंद्रांवर १११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर चार बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असून त्यांच्यामार्फत चार तालुक्यांमध्ये प्रत्येक गुरुवारी ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तपासणी शिबिरांचे आयोजन सुरू आहे. मुंबईतील जसलोक, हिंदुजा, वाडिया व ग्लोबल रुग्णालय येथील बालरोग तज्ज्ञांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाडय़ांमधील, स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळच्या अंगणवाडी/मिनी अंगणवाडीमध्ये नोंदणी झाल्यापासून गरोदर स्त्रियांना बाळंतपणापर्यंत व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर ६ महिने एक वेळ चौरस आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत कमी वजनाची बालके, वाढ खुंटलेली मुले, उंचीच्या प्रमाणात कमी वजन असलेली बालके इत्यादी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या अंगणवाडय़ांतर्गत ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व शाकाहारी मुलांना दोन केळी मांसाहारी मुलांना एक उकडलेले अंडे आठवडय़ातून चारवेळा म्हणजेच महिन्यातून १६ दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार पुरविण्यात येतो.