प्रयोगशील पालकत्वध्यासाची चैतन्यमूर्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! या व्रतासाठी प्रसंगी निखाऱ्यांवरूनही चालत जावं लागलं तरी बेहत्तर, ही त्यांची मनोवृत्ती. याची तयारी त्यांनी कळत्या-नकळत्या वयापासूनच करायला सुरुवात केली होती. त्यासाठी या चैतन्यमूर्तीला आकार कसा मिळत गेला आणि तो कोण-कोण देत गेलं हे पाहणं खरंच उद्बोधक ठरेल.राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची।स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी तू त्यांची।जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्नमधुर ते ते। स्वतंत्रते भगवती, सर्व तव सहचारी होते । स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या काव्यपंक्ती! या काव्यपंक्ती नुसत्या वाचल्या किंवा ऐकल्या तरी सर्वसामान्यांचं रक्त सळसळतं. आपल्या प्राणप्रिय स्वातंत्र्यलक्ष्मीचा ध्यास ज्या उत्कटतेनं, झोकून देऊन, कळत्या वयापासूनच त्यांनी घेतला होता, त्या उत्कट वृत्तीबद्दल थक्क व्हायला होतं! अक्षरश: एकच ध्यास. परवशतेच्या दास्यातून राष्ट्र मुक्त झालं पाहिजे! या ध्यासाची चैतन्यमूर्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! या व्रतासाठी प्रसंगी निखाऱ्यांवरूनही चालत जावं लागलं तरी बेहत्तर, ही त्यांची मनोवृत्ती. जे जे प्रतिकूल तेच घडेल असा विचार करून सतत संपूर्ण तयारीनिशी सज्ज राहणं हे त्यांचं आगळंवेगळं तत्त्व. हे तत्त्व केवळ सांगण्यापुरतं नव्हतं. त्याचा अंगीकार करूनच त्यांनी सशस्त्र क्रांतिलढय़ात सहभाग घेतला होता. याची तयारी त्यांनी कळत्या-नकळत्या वयापासूनच करायला सुरुवात केली होती. या स्वातंत्र्य लढय़ात सावरकर बंधूंचा सक्रिय सहभाग होता. या सहभागाबद्दलची मनोधारणा कशी घडत गेली, त्यासाठी या चैतन्यमूर्तीला आकार कसा मिळत गेला आणि तो कोण-कोण देत गेलं हे पाहणं खरंच उद्बोधक ठरेल.२८ मे १८८३ रोजी नाशिकजवळच्या भगूर इथं विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे विद्याव्यासंगी, करारी आणि स्वाभिमानी अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांनी इंग्रजीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्याकडे संभाषणचातुर्य, काव्यरचनेची देणगी होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यांना आपल्या पूर्वेतिहासाचा अभिमान होता. स्वत:च्या पाळामुळांचं कायम स्मरण होतं. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. या सगळ्याचा ताळमेळ जमवत त्यांनी घरात करडी शिस्त राखली होती. त्यांची बायको राधाबाई या वृत्तीने धार्मिक आणि स्वभावाने ऋजु होत्या. यांना चार अपत्ये होती. गणेश (बाबाराव), विनायक (तात्याराव), मैनाबाई (माई) आणि नारायण (बाळाराव).रात्री झोपायच्या आधी, संपूर्ण कुटुंबाचा एकत्र बसून अनेक ग्रंथांमधल्या उताऱ्यांच्या पठणाचा कार्यक्रम व्हायचा. दामोदरपंतांना रामायण आणि महाभारत यातले उतारे तोंडपाठ असत. मुलांना ते राणा प्रताप, शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी, पोवाडे वाचून दाखवत असत. होमर हा त्यांचा आवडता कवी होता. याचवेळी, बाबाराव, आईच्या सांगण्यावरून, भरतकथासंग्रह, पांडवप्रताप, रामविजय, हरिविजय, शिवलीलामृत आणि जैमिनी अश्वमेध या ग्रंथांमधले उतारे बाकीच्या भावंडांसमोर वाचून दाखवायचा आणि या उताऱ्यातल्या काही महत्त्वाच्या मुद्दय़ांची दामोदरपंत राधाबाईंबरोबर चर्चा करायचे. ही चर्चा या अभ्यासपूर्ण वातावरणात या मुलांच्या कानावर पडायची. या ग्रंथांच्या बरोबरीनं दामोदरपंत बाबारावाला विष्णुशास्त्री चिपळूणकरलिखित निबंधमाला याचंही वाचन करायला लावायचे. याचबरोबर मुलं केसरी, पुणे वैभव, गुराखी यांसारख्या वृत्तपत्रं-मासिकांचं वाचनही उत्सुकतेनं करत. याचा परिणाम असा झाला की, सहाव्या-सातव्या वर्षांपासूनच छोटय़ा विनायकला वाचनाची आवड लागली. इतिहास आणि महाकाव्य यांची विलक्षण गोडी लागली. त्यातून स्फूर्ती मिळाली. जे काही हाताला येईल मग ते वृत्तपत्र असो किंवा पुस्तक असो, ते संपूर्णच्या संपूर्ण वाचून काढत असे. अभ्यासाला बसला म्हणजे तो भान हरपून, चिकाटीनं अभ्यासात मग्न होत असे. विनायक दहा वर्षांचा असेल, तेव्हा आई राधाबाई यांचं पटकीच्या आजारानं निधन झालं. त्यावेळी राधाबाई होत्या अवघ्या ३२ वर्षांच्या. मुलं लहान. लहानगा बाळाराव अशक्त प्रकृतीचा असल्यानं आईला त्याची सर्वात जास्त काळजी होती. त्याची तसंच बाकीच्या भावंडांची काळजी घ्यायचं वचन बाबारावाकडून तिनं घेतलं होतं. दामोदरपंतांनी मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी, स्वत: दिवसरात्र खपून घरातली काबाडकष्टाची कामं केली. कर्तव्यबुद्धीनं आणि प्रेमानं मुलांचं संगोपन केलं.भगूरमधलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाबारावांबरोबर विनायक माध्यमिक शिक्षणासाठी नाशिकला आले. या काळात महाराष्ट्रात, प्लेग आणि दुष्काळ यांचं तांडव चालू होतं. ही परिस्थिती कमी म्हणून प्लेगला आळा घालण्याच्या उपाययोजनांच्या नावाखाली, इंग्रजांचा जुलूम वाढतच होता. अत्यंत पराकोटीची परिस्थिती होती. इंग्रजांच्या अत्याचाराला लगाम घालण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केला. परिणामी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. यामुळे अस्वस्थ होऊन छोटय़ा विनायकानं आपल्या कुलदेवीसमोर राष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानं एका रात्री त्या मनोवस्थेत चाफेकरांवर एक पोवाडा लिहिला. तो लिहीत असताना, त्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं, त्याला हुंदके आवरेनासे झाले. त्याचे हुंदके ऐकून दामोदरपंतांना जाग आली. बघतात तो, इतक्या रात्री तात्या दिव्याजवळ बसून काही तरी लिहीत होते. उठून त्यांनी तो कागद घेतला आणि वाचला. इतका जहाल पोवाडा वाचून दामोदरपंतांना काळजी वाटू लागली. त्यांनी छोटय़ा विनायकाची समजूत घालायचा प्रयत्न केला. ‘‘अशी प्रक्षोभक कवने तू रचू नकोस, त्याऐवजी हलकी-फुलकी गीतं तू रच.’ पित्याला या आपल्या सुपुत्रातला जहालपणा तीव्रतेनं जाणवला आणि त्यातला धोका त्यांनी छोटय़ा विनायकाला जाणवून दिला.निरनिराळ्या स्पर्धा, संमेलने यातून छोटय़ा विनायकचं वाक्चातुर्य प्रभाव पाडायलं लागलं. सुरुवातीला, परीक्षकांना, शिक्षकांना त्याच्या लहान वयामुळे कविता, भाषणं त्यानं लिहिली आहेत यावर विश्वास बसत नव्हता, परंतु विश्वास ठेवण्यावाचून पर्यायही नव्हता.१८९९च्या एप्रिल महिन्यात, दामोदरपंत प्लेगच्या साथीचे बळी ठरले. या आपत्तीमुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी बाबारावांवर आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बिघडली होती. स्थावर मालमत्ता कुणीतरी दाबून टाकली होती. भांडीकुंडी अनेकांनी लांबवली. सावरकरबंधू येसूवहिनीसह नाशिकमध्ये दातार-वर्तक कुटुंबीयांच्या आधारानं राहात होते. बाबाराव स्वत: अर्धपोटी राहत, पण धाकटय़ा भावंडांना काहीही उणे पडू देत नसत. विनायकाची अभ्यासातली प्रगती पाहता, बाबारावांची जिद्द होती, की विनायकाच्या शिक्षणात आर्थिक परिस्थितीमुळे कुठेही खंड पडता कामा नये. अशावेळी येसूवहिनींच्या साथीनं घरातल्या अडचणींवर बाबारावांनी मार्ग काढत मार्गक्रमण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘बाबांचे जुनेपुराणे कपडे बळेच काढून टाकून द्यावेत, तेव्हा नवे घेत आणि वहिनीची फाटकी लुगडी पाहून जेव्हा मी धरणे धरी किंवा माझ्या कोटाला पैसे मागून त्याचे लुगडे आणी तेव्हाच घरी नवे लुगडे येई. देणेदारांच्या जप्तीसाठी शेवटी तिने आपले माहेरचे दागिनेदेखील उतरून दिले.. तिच्या अंगावर दागिना असा उरला असेल, तर तो तिचे ते आमच्या संगतीत कधीही न कंटाळलेले संतोषाचे प्रसन्न हास्य!’स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित मॅझिनीचं चरित्र प्रकाशित केलं बाबाराव सावरकरांनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात परदेशी वस्तूंची होळी आयोजित केली होती. बाबारावांनी अशीच होळी नाशिकमध्ये आयोजित केली होती. या आणि अशा कामांमध्ये बाबारावांचं नेहमीच सक्रिय योगदान होतं. मॅझिनीच्या चरित्राच्या प्रकाशनासाठी इंग्रजांनी बाबारावांना अंदमानात काळ्या पाण्याची आजन्म कारावासाची शिक्षा केली.मानसिक, बौद्धिक मशागतींइतकंच शारीरिक मशागतीचं, कसरतींचं महत्त्व बाबारावांना पहिल्यापासूनच होतं. ते स्वत: योगसाधनेची तपस्या करायचे. विनायक १२-१३ वर्षांचा असल्यापासूनच सूर्यनमस्काराने व्यायामाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी बाबारावांचं सूत्र असे की, जमिनीवर नमस्काराची घामाची मूर्ती उमटेपर्यंत सूर्यनमस्कार घालायचे. बाबाराव तसे घालतही. त्या उदाहरणाने विनायकही तसे नमस्कार घालायला लागला. विनायक दिसायला लहान असल्यामुळे आणि व्यायामाच्या उपयुक्ततेवर व्याख्यान द्यायला उभं राहिल्यावर कोणी हिणवू नये म्हणून आधी व्यायाम करायला लागायचा. अर्थात या व्यायामाच्या, अंगमेहनतीच्या पुण्याईमुळे, शरीरात भिनलेल्या काटकपणामुळेच, मार्सेलिस बंदरावरची ती जगप्रसिद्ध उडी, अंदमानातली काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली,..अत्यंत धैर्याने! या कल्पनातीत हालअपेष्टांमधून जात असताना, ‘कमला’ काव्याची निर्मिती केली, ती त्यांच्या सदैव सज्ज असण्याच्या मनोभूमिकेमुळे, तल्लख बुद्धीमुळे. अत्यंत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनामुळे धार्मिक कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नव्हता. विज्ञानाधिष्ठित विचार मांडता मांडता अस्पृश्यता निवारणाच्या चळवळींना रत्नागिरीत त्यांनी सुरुवात केली. इंग्रजी भाषेतल्या शब्दांचे प्रतिशब्द मराठी भाषेत तयार केले. समाजप्रबोधनाच्या कामाबरोबरच, अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने, माझी जन्मठेप, मॅझिनीचे चरित्र, कमला काव्य यांसारख्या लेखनाचा, काव्याचा सिद्धहस्त लेखक, कवी आणि शायर. त्यांच्या लेखनाची ताकद इतकी की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला सावरकर लिखित अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर अभ्यासण्यासाठी लावले. किती पैलूंचा हा हिरा. याचं तेज या सगळ्या कलाकृतींना झळाळून टाकतं.राष्ट्रासाठीचा पराकोटीचा त्याग, अपार कष्ट, हालअपेष्टा, वैचारिक मतभेद या इतक्या प्रतिकूल परिस्थितीतूनही, आपल्या ध्येयापासून तसूभरही विचलित झाले नाही. उलट ध्येयपूर्तीचा आनंद साध्य करण्यासाठी त्यांनी आत्मार्पण केले. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते अनंतात विलीन झाले.आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करताना त्यांनी अंगीकारलेले तत्त्व होते- की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचेबुद्धय़ाचि वाण धरिले करि हे सतींचे