० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा. ० आपली पादत्राणे नरम, आरामदायी घ्यावीत. भेगाळलेल्या पायांना घट्ट व कडक चपलांमुळे जास्त इजा होते. ० पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापणे टाळा. कापताना त्वचा खेचली गेली किंवा कात्री लागली तर जखम चिघळून संसर्ग होण्याची शक्यता असते. ० रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा. असे केल्याने पायांना आराम वाटेल व धूळ, माती निघून जाईल. ० झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या. ० साखर आणि साय एकत्र करून त्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्या, यामुळे भेगा कमी होतील. ० मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर नियमित सोडावे, त्यामुळे टाचा मुलायम राहतील. ० भेगांकडे दुर्लक्ष केल्यास कोरडेपणामुळे त्या रुंदावतात व त्यातून रक्त येते. काही वेळा चालताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना नियमित स्निग्ध पदार्थाने मसाज करावा. ० पावसाळ्यात पायांच्या नखांवर मॅचिंग किंवा पारदर्शक नेलकलर लावा. त्यामुळे नखांच्या कडेला माती साचून तेथे होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल, ० पावसाळ्यात शक्यतो बंद चप्पल किंवा सँडल वापरणे टाळा, बंद चपलांमध्ये ओलसरपणा राहातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. ० पावसाळ्यात सतत पाण्याशी संपर्क येत असल्याने पायाच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी पडते व गळून पडते, खाज सुटते, त्यातून रक्त येते. यासाठी चप्पल वा शूज घालण्यापूर्वी बोरिक पावडर असलेली टॅल्कम पावडर तेथे लावा. अँटिसेप्टिक मलमही लावू शकता. संकलन- उषा वसंत - unangare@gmail.com