नेपाळमधील जबरदस्त भूकंपामुळे एकीकडे इमारती व ऐतिहासिक स्मारके धराशायी होत असतानाच, आपली घरे कोसळून त्यांचे मलब्यात रूपांतर होत असल्याने नागरिक हादरून गेले होते. या भूकंपातून वाचल्यामुळे त्यांना सुदैवी म्हणता येईल खरे; परंतु या संकटात आपल्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी झगडण्याची आणि आपल्या प्रियजनांचा मृत्यू स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्याचीही वेळ त्यांच्यावर आली..

तिसऱ्या जगाचे शाप

भूकंपबळींनी २ हजारांचा आकडा पार केला असतानाच दुसऱ्या दिवशीही जाणवलेल्या झटक्यांचे सावट सर्वत्र कायमच होते.. शनिवारच्या भूकंपामुळे बेघर झालेल्यांना रात्र उघडय़ावर काढावी लागली, एवढेच नव्हे तर त्यांना अन्न आणि निवाऱ्याच्या समस्येशीही झगडावे लागले.

या भयभीत झालेल्या लोकांमध्ये नेपाळमध्ये कामासाठी किंवा पर्यटक म्हणून आलेल्या शेकडो भारतीयांचाही समावेश आहे. विनाशाच्या तांडवात सापडलेल्या या लोकांच्या मनात सध्या फक्त घरी परत जाण्याचा विचार आहे. ‘काल इथे जे काय घडले ते पाहून आम्हाला धक्का बसला आहे.. अन्न व पाणी मिळत नसल्याने आणि जवळजवळ सर्वच दुकाने बंद असल्याने माझे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे,’ असे काठमांडूत मजूर म्हणून काम करणाऱ्या कोलकात्याच्या एका माणसाने सांगितले. ‘किमान ५०० ते १ हजार लोक इथे आले आहेत.. आम्ही सगळे घरी परत जाऊ इच्छितो. पण विजेअभावी काहीच माहिती मिळत नसल्यामुळे परत कसे जायचे याची आम्हाला काहीच कल्पना नाही,’ असे तो म्हणाला.

७.९ रिश्टर स्केल इतक्या मोठय़ा तीव्रतेच्या या भूकंपामुळे नेपाळमधील हजारो लोक विस्थापित झाले. रस्त्यांना भल्यामोठय़ा भेगा पडल्या आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. भयभीत लोकांनी उघडय़ा आभाळाखाली रात्र घालवली खरी, परंतु आणखी धक्के जाणवण्याच्या भीतीने कुणीही सुखाने झोपू शकला नाही.

भूकंप झाला, तेव्हा थॉमस निबो हा मुक्त छायाचित्रकार एका कॉफी शॉपमध्ये बसला होता. त्याला पहिल्यांदा जो धक्का जाणवला, तो किरकोळ कंप असावा असे त्याला वाटले. ‘या भागात भूकंप ही काही नवी गोष्ट नाही. हा हादरा असेल आणि लवकर नाहीसा होईल असेच अनेक लोकांना वाटत होते, परंतु असा प्रकार नसल्याचे त्यांनी पाहिले, तेव्हा सर्व जण सैरावैरा पळाले,’ असे त्याने एका दूरचित्रवाहिनीला सांगितले. भूकंपाच्या धक्क्य़ांची तीव्रता वाढली, तेव्हा हजारो लोक दाट लोकसंख्येच्या या शहराच्या स्त्यांवर आले. निबोला मलब्याच्या एका प्रचंड ढिगाऱ्यावर उभी असलेली एक महिला दिसली. तिची मुले त्या ढिगाऱ्याखाली अडकली होती.

एका ऑस्ट्रियन इसमाने सांगितले, आम्ही शहराच्या मध्यभागी फिरत होतो आणि अकस्मात भूकंप आला.. आम्ही पार गळाठून गेलो.. आम्ही असा प्रकार पूर्वी कधीच पाहिला नव्हता. देवाची कृपा म्हणूनच आम्ही वाचलो. भूकंपामुळे विमान रद्द झाले. आम्हाला सात तास वाट पाहण्यासाठी सांगण्यात आले, परंतु आताच २८ तास उलटून गेले असून एअरलाइन्सकडून काहीही माहिती मिळालेली नाही.

आक्रोश आणि घबराट
हिमालयाचे हादरे सुरूच
महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप

२२ गिर्यारोहक ठार, २१७ बेपत्ता..
भूकंपग्रस्तांचे युद्धपातळीवर बचावकार्य
पर्यटकांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न
नेपाळमध्ये भूकंपात ८० टक्के मंदिरांचे नुकसान

भूकंपाच्या धक्क्य़ांमुळे लखनऊतील रुग्णालयातील रुग्णांना रस्त्यावर हलवण्यात आले. तर नेपाळमध्ये  पर्यटनासाठी गेलेल्या अनेक भारतीयांना काठमांडू विमानतळावर ताटकळावे लागले.
******
प्रलयंकारी भूकंपामुळे भयकंपीत झालेल्या काठमांडूवासीयांसाठी मैदानात तंबूंची उभारणी करण्यात आली आहे. जखमींवरील उपचारासाठी भारतातून खास वैद्यकीय पथके काठमांडूमध्ये दाखल झाली आहेत.
******
भूकंपानंतर लोक सैरावैरा पळाल्यामुळे जवळजवळ चेंगराचेंगरीच झाली.. लोक कुणाचे वय न पाहता एकमेकांवर पाय देऊन जात होते.. लोक इतके वेडेपिसे झालेले फारच धक्कादायक होते.
 – एक विदेशी पर्यटक
******
एका महिलेची मुले अडकलेल्या ढिगाऱ्याभोवती आम्ही पळत होतो.. आम्हाला काहीच ऐकू येत नव्हते.. मुले जिवंत असण्याची अजिबात शक्यता नव्हती.
  – थॉमस निबो.
******
गेल्या २० वर्षांपासून मी माझ्या कुटुंबासोबत येथे राहतो आहे. आम्ही घरात बसलो होतो, तेव्हा जमीन हलत असल्याचे आम्हाला जाणवले. लगेच आम्ही बाहेर पळालो. अगदी थोडे अन्न आमच्याजवळ आहे.. मलाच नव्हे, तर मदत शिबिरातील प्रत्येकालाच अन्न व पाण्याची टंचाई जाणवते आहे. कोलकात्याला परत कसे जायचे, याची आम्हाला चिंता आहे.
– कोलकात्याचा एक मजूर

विमान वाहतुकीला फटका
भूकंपग्रस्त नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर भारतातून गेलेली एअर इंडिया, स्पाइसजेट व इंडिगोची विमाने उतरू न शकल्यामुळे काठमांडूसाठीच्या हवाई सेवेला आजही फटका बसला. या ठिकाणी आजही भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांना तेथून हलवण्यात आले. केवळ एअर इंडियाचे प्रत्येकी एक विमान सकाळी दिल्ली व कोलकाता येथून अनुक्रमे ११८ व ४५ प्रवाशांना घेऊन काठमांडूला पोहोचू शकले. नंतर १३५ व ४५ प्रवाशांना घेऊन ही विमाने परतली.