पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी आहे असे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. हाफिज सईदची नोंदणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (एटीए) करण्यात आली आहे. त्यामुळे तो एक दहशतवादी आहे याची कबुलीच पंजाब सरकारने दिली आहे.  हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ यांच्या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत. याबरोबरच अब्दुल्ला ओबैद, जफर इकबाल, अब्दुर रहमान, आबिद यांची नावे देखील या यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एटीएच्या यादीमध्ये जर एखाद्याच्या नावाचा समावेश झाला तर ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रुपाने दहशतवादाशी संबंधित आहे असा अर्थ काढला जातो. हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांना एटीएच्या यादीमध्ये टाकून पंजाब सरकारने ही कबुली दिली आहे.

चौथ्या सूचीतील नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे हाफिज सईदला शिक्षा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या यादीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश आहे त्या व्यक्तींना परदेश प्रवासावर निर्बंध लावले जातात, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होतात. त्यांना वेळोवेळी न्यायालयात हजर राहावे लागते आणि त्याच्यावर सरकारची करडी नजर असते. हाफिज सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश होण्याआधी त्याच्यावर परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. हाफिज सईदची फलाह-इ-इंसानियत नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत त्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. या संस्थेच्या मालकीच्या अनेक रुग्णवाहिका आहेत. त्या माध्यमातून त्याने त्याचे मोठे जाळे निर्माण केले आहे. याच संस्थेमार्फत काश्मीर दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी हाफिज सईदने भारताला काश्मीरचा नाद सोडण्याचीही धमकी दिली होती. हाफिज सईद त्याच्या दहशतवादी कारवाया या संस्थेच्या साहाय्याने करतो. हाफिज सईदच्या जमात उद दवा या संघटनेवर बंदी आल्यानंतर फलाह-इ-इंसानियत मार्फतच तो त्याच्या कारवाया सुरू ठेवेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आपल्यावरील नजरकैद हटविण्यात यावी तसेच आपल्यावरील परदेश प्रवासाची बंदी देखील उठवण्यात यावी अशी विनंती त्याने न्यायालयाला केली आहे.