कोणत्याही परिस्थितीत भारताशी दोन हात करण्यास सक्षम असल्याचे पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी गेल्याच आठवड्यात म्हटले होते. त्यावेळी बोलताना अब्बासींनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा मोठ्या गर्वाने उल्लेख केला होता. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांनी ज्या अण्वस्त्रांचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला, तीच अण्वस्त्रे धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रे अपघातग्रस्त होण्याचा किंवा दहशतवाद्यांकडून चोरी होण्याचा धोका असल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. भारतीय सैन्याच्या 'कोल्ड स्टार्ट' रणनितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यावेळी त्यांनी अण्वस्त्र आणि लघु पल्ल्याच्या शस्त्रांचा उल्लेख केला होता. मात्र याच अण्वस्त्र आणि शस्त्रांना धोका असल्याचे फेडरेशन ऑफ अमेरिकन साईन्टिस्ट्स (एफएएस) या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. पाकिस्तानने ९ विविध भागांमध्ये अण्वस्त्र तैनात ठेवली असल्याची माहिती या अहवालात आहे. पाकिस्तानविरुद्ध युद्धाला तोंड फुटल्यास कारवाई करण्यासाठी भारताने 'कोल्ड स्टार्ट' रणनिती तयार केली आहे. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट' रणनितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने अण्वस्त्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची परवानगी पाकिस्तानी सैन्याला देण्यात आली आहे. पाकिस्तानने ९ विविध भागांमध्ये अण्वस्त्रे ठेवली असल्याचा एफएएसचा अहवाल सांगतो. 'पाकिस्तानने त्यांची अण्वस्त्रे विविध तळांवर तैनात केली आहेत. या तळांवरुन अण्वस्त्रे डागली जाऊ शकतात. या तळांवर अण्वस्त्र डागण्याची सुविधा उपलब्ध आहे,' असे अहवाल तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हँस क्रिस्टनसन यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. 'लघु पल्ल्याची अण्वस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. या अण्वस्त्रांचा साठा करुन ठेवण्यात येईल आणि योग्यवेळी त्यांना असेंबल करुन तळांवर पाठवण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली. 'लघु पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर लढाईला तोंड फुटल्यावर लगेच केला जातो. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात लघु पल्ल्याची शस्त्रे कामी येतात. त्यामुळेच पाकिस्तानला संकटकाळात सुरुवातीलाच ही शस्त्रे तळांवर पाठवावी लागतील. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. परंपरागत हल्ल्यांमध्ये या शस्त्रांचा वापर झाल्यास युद्ध अण्वस्त्रांकडे झुकेल,' असेही क्रिस्टनसन यांनी म्हटले. पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांकडून चोरली जाण्याचा धोका आहे. तसे घडल्यास मोठा अनर्थ घडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.