शिवसेना खासदार संजय राऊत यांचा राष्ट्रवादीवर षडयंत्र रचल्याचा घणाघात

मराठा मोर्चामागे  राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे डोके असून त्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटविण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. शांततेत चाललेल्या मोर्चामध्ये हिंसाचार घडविण्याचा काहीजणांचा डाव असल्याचाही दावा त्यांनी केला. मराठी हीच आमची जात असल्याचेही त्यांनी ठणकाहून सांगितले.

‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ‘सामना’चे कार्यकारी संपादक असलेल्या राऊत यांनी त्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसला लक्ष्य केले. ‘‘सत्तेत असताना ज्यांना मराठा समाजाचे हित करता आले नाही, ते आता केवळ जातीय विष पेरून महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचे षड्यंत्र रचत आहेत. अशाने महाराष्ट्र अखंड राहणार नाही. म्हणूनच मराठी हीच आमची जात असल्याचे आम्ही अभिमानाने सांगतो. आता मराठय़ांचा पुळका आलेल्यांची सत्तेत असताना नरडी दाबली गेली होती का?,’’ असा सवाल विचारून ते म्हणाले, ‘‘निवडणुकीत पराभवाची धूळ खावी लागलेली काही मंडळी गटातटांना हाताशी धरून गलिच्छ राजकारण करत आहे. आता तावातावाने बोलणारे नारायण राणे यांनी सत्तेत असताना काय दिवे लावले. त्यांचा अहवाल निर्दोष असता तर आरक्षण न्यायालयांमध्ये टिकले असते.’’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत. त्यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे. मात्र, त्यांना हटविण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामागे कोण आहे, हे मला माहिती आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खाते असल्याने त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते, असेही ते म्हणाले.