आम आदमी पक्षाचे संस्थापक शांती भूषण यांनी किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून चाणाक्ष खेळी केल्याचे सांगत पक्षाला अडचणीत आणले. तसेच आपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केल्याने पक्षाची कोंडी केली. शांती भूषण यांचे वक्तव्य वैयक्तिक असून पक्षात लोकशाही असल्याचे हे लक्षण आहे, अशी सारवासारव ‘आप’ने केली आहे.
किरण बेदी जर मुख्यमंत्री झाल्या तर अण्णा हजारे यांना आनंद वाटेल. अण्णांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात बेदींची भूमिका प्रभावी होती, असे प्रशस्तीपत्रकही भूषण यांनी दिले. बेदी यांना पक्षात घेऊन भाजपने इतरांना धक्का दिल्याचे त्यांनी सांगितले. किरण बेदी यांनी शांती भूषण यांच्या वक्तव्याबद्दल धन्यवाद देत, प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम आदमी पक्षाची वाटचाल पक्ष स्थापन करताना जे उदात्त ध्येय होते त्यानुसार नाही असा  टोला त्यांनी लगावला.

‘आप’ची नाराजी
शांती भूषण यांच्या टीकेवर आपने सावध प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात अंतर्गत लोकपाल प्रक्रिया आहे. त्या आधाराचे आम्ही नुकतेच दिल्लीत दोन उमेदवार बदलले, असे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. भूषण यांच्या मताशी पक्ष सहमत नाही, असे पक्षाचे आशुतोष यांनी सांगितले. यापुर्वी भूषण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते याची आठवण करुन दिली.