शेजारच्या गावातील सात जणांचे अपहरण करून पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी १३ जणांना छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्य़ातून अटक करण्यात आली आहे. हरदिझारिया गावातील नागरिकांनी रविवारी रात्री शेजारच्या छिरवानी गावातील सात जणांचे अपहरण केले. या अपहृतांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर नागरिकांनी हल्ला चढविला, असे रायगडचे पोलीस अधीक्षक संजीव शुक्ल यांनी सांगितले.हरदिझारिया गावात विजेची तीव्र टंचाई असून शेजारच्या छिरवानी गावातील नागरिकांनी पारेषण वाहिन्या कापल्याने विजेची टंचाई भासत असल्याचा संशय हरदिझारियातील रहिवाशांना आला होता. त्यामुळे येथील रहिवाशांनी सात जणांचे अपहरण केले, असे प्रथामिक चौकशीत आढळले आहे. या अपहरणाची खबर मिळताच पोलीस पथक त्यांची सुटका करण्यासाठी गेले. तथापि, अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका करण्यास नकार दिला आणि पोलीस पथकावर हल्ला चढविला. त्यामध्ये चार पोलिसांसह १४ जण जखमी झाले.