जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऐन रंगात आल्या असताना काँग्रेस पक्षातील गटबाजीलाही ऊत आला आहे. जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांच्यातील पुत्रप्रेमाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. राहुल आवाडे यांचा उमेदवारीचा पत्ता कापला गेल्याने जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीवेळी संजय आवळे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली होती, त्याला आवाडे यांनी इन्कार केल्याने आता आवळे यांनी राहुल यांची उमेदवारी रोखल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेसचे कार्यकत्रेच काँग्रेसच्या विरोधात उभे ठाकणार असल्याने यादवी तापण्याची चिन्हे आहेत. रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये प्रकाश आवाडे यांना सहभागी करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवरून करण्यात आला. तरीही हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक िरगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. ती मान्य झाली नाही. आता जनता कोणासोबत आहे याची प्रचिती या निवडणुकीत दिसून येईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. शिवसेना - आवाडे गट युती फिस्कटली कोल्हापूर येथे आवाडे गटाशी झालेल्या बठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांच्यात चर्चा झाली पण जागावाटपाचा वाद न मिटल्याने शिवसेना व आवाडे गटाची युती फिस्कटली. युती फिस्कटल्याने संपूर्ण हातकणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषदेच्या जागांसह सर्व पंचायत समितीच्या जागा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. जाधव म्हणाले, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतला. आवाडे गटाच्या हातून लोकसभा, विधानसभेची जागा गेली, आता जिल्हा परिषदही हातातून काढून घेऊ. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांना बाहेर बसवू.