भारतीय महिला संघातील धमाकेदार फलंदाज हरमनप्रीत कौरने अंतिम सामन्यात दमदार अर्धशत ठोकले. अंतिम सामन्यातील पहिला षटकार सलामवीर पुनम राऊतच्याबॅटमधून निघला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २२८ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर षटकार मारता आला नाही. भारताला मितालीच्या रुपात दुसरा धक्का बसल्यानंतर हरमनप्रीत मैदानात उतरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतकी खेळीमुळे या सामन्यात तिच्याकडून तशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा होती. हरमनप्रीतने ही भारतीयांना नाराज केले नाही. झटपट दोन गडी बाद झाल्यानंतर कोणताही दबाव न घेता सयंमी खेळी करत पुनमला तिने चांगली साथ दिली. या सामन्यात तिने ८० चेंडूचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. २००९ च्या पहिला विश्वचषक खेळताना हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तब्बल ११० मीटर लांब षटकार खेचला होता. तिच्या या षटकाराने त्यावेळी सर्वांनाच थक्क केले. एवढेच नाही तर यावेळी तिच्या बॅटची तपासणी देखील करण्यात आली होती. हरमनप्रीत बाद झाली असली तरी तिने दिलेल्या योगदानामुळे भारतीय संघ सुस्थित आला. हरमनप्रीत फटकेबाजी करण्यावर विश्वास ठेवते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उंपात्य सामन्यात क्रिकेट चाहत्यांना तिने हे दाखवूनही दिले. या सामन्यात तिने तब्बल ७ उत्तुंग षटकार खेचले होते. मात्र आजच्या सामन्यात संयमी खेळी करत भारताच्या डावाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने ११५ चेंडूत १७१ धावांची दमदार खेळी केली होती. तिच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. सुरुवातीच्या साखळी सामन्यात तिला फारशी चांगली खेळी करता आली नाही. मात्र अखेरच्या क्षणी तिला गवसलेला सूर हा भारतीय संघासाठी फायदेशीर ठरला, यात हे कोणीही नाकारू शकणार नाही.