सुदीरमन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनकडून धुव्वा सुदिरमन चषक मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आणि दहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चीनने भारताचा ३-० असा धुव्वा उडवला. नववे मानांकन मिळालेल्या भारतासाठी चीनची भिंत भेदणे तसे आव्हानात्मकच मानले जात होते. मात्र अश्विनी पोनप्पा आणि सत्विकसाईराज रॅनकिरेड्डी या मिश्र दुहेरीतील जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ल्यू कि आणि ह्युआंग यॅक्विआँग जोडीला आव्हान दिले. मात्र अनुभवी चिनी जोडीने अश्विनी आणि सत्विकसाईराज यांना १६-२१, २१-१३, २१-१६ असे पराभूत केले. मग के. श्रीकांतने ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला टक्कर दिली. पुरुष एकेरीची ही लढत ४८ मिनिटे चालली, श्रीकांत यात आपले कौशल्य दाखवले, परंतु तो चीनच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकला नाही. अखेरीस लाँगने श्रीकांतला २१-१६, २१-१७ असे नामोहरम केल्यामुळे चीनला २-० अशी आघाडी मिळाली. सत्विकसाईराज आणि चिराग सेन या युवा जोडीने मग मिश्र दुहेरीत फू हॅफेंग आणि झँग नॅनचा सामना केला. अध्र्या तासाच्या या लढतीत चीनने २१-९, २१-११ असा सहज विजय मिळवीत ३-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत फक्त २०११मध्ये बाद फेरीसाठी पात्र ठरला होता. त्या वेळीही चीननेच भारताला ३-१ असे पराभूत केले होते. आता चीनची उपांत्य फेरीत जपान आणि मलेशिया यांच्यातील विजेत्या संघाशी गाठ पडणार आहे.