ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिका २-० ने जिंकून पराभवाचा वचपा काढला आहे. मेलबर्न स्टेडियमवरील दुसरा ट्वेन्टी-२० सामना भारतीय संघाने २७ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियालाला १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्याचा नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत २० षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावा कुटल्या. भारताकडून रोहित शर्माने (६०) धावांची, तर विराट कोहलीने ३३ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. धवनने ३२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात करत सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. अरोन फिंच आणि शॉन मार्श यांनी चांगली सुरूवात करून दिली, पण मार्श बाद झाल्यानंतर लायन आणि मॅक्सेवल स्वस्तात तंबूत परतल्यामुळे सामन्यावर भारताने पकड निर्माण केली. त्यानंतर फिंच धावचित बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डावच कोसळला. ऑस्ट्रेलियाकडून फिंचने सर्वाधिक ७४ धावा केल्या.भारताकडून फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि बुमराने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अश्विन, पंड्या आणि युवराजने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

दरम्यान, टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी सलामीवीर जोडीने चांगली सुरूवात करून दिली होती. रोहितची बॅट याही सामन्यात चांगली तळपली. धवन देखील साजेशी साथ देत होता, पण रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात ११ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन धवन माघारी परतला. त्यानंतर कोहलीने संघावर कोणताही दबाव निर्माण होऊ न देता. पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्मा १६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात धावचित बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येची धुरा सांभाळत विराट कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली. विराटला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने साजेशी साथ देत ९ चेंडूत १४ धावा केल्या.

सामनावीर- विराट कोहली</strong>