स्वाईन फ्लूमुळे पुण्यात सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुण्यातच राहणारे होते. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या २४ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ८ रुग्ण पुण्यातील रहिवासी होते, तर इतर शहराच्या आसपासच्या भागातून, तसेच जवळच्या जिल्ह्य़ांमधून उपचारांसाठी पुण्यात आले होते.सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे दिसत असताना अनेकदा ४-५ दिवस घरीच उपचार घेऊन पाहण्याकडे रुग्णांचा कल असतो. परंतु सध्याच्या स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावात आजार अंगावर काढणे टाळून लक्षणे दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरी सल्ला घ्या, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. ज्या रुग्णांना सर्दी-खोकला व उलटय़ा-जुलाब ही लक्षणे एकत्रितपणे दिसत असतील त्यांच्यावर उपचार करतानाही स्वाइन फ्लूची शक्यता डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगण्यात आले आहे. पुण्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या चार मृत्यूंमध्ये एका ८ वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. २३ मार्च रोजी तिची स्वाईन फ्लूसाठी चाचणी करण्यात आली होती, तर २७ मार्चला तिच्या आजाराचे निदान झाले, परंतु त्यापूर्वीच- २३ मार्चलाच तिचा मृत्यू झाला. तिला कोणतेही इतर आजार नव्हते, तसेच तिच्या उपचारांनाही उशीर झाला नव्हता, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मृतांमध्ये ३६ वर्षे व ३८ वर्षांच्या दोन तरुणांचा व एका ४७ वर्षांच्या पुरूष रुग्णाचाही समावेश आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात १३५ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यातील २४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २९ स्वाईन फ्लू रुग्ण शहरात विविध रुग्णालयांत दाखल असून त्यातील १६ रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. हे लक्षात ठेवा * प्रत्येक सर्दी-खोकला स्वाईन फ्लू नसतो, परंतु आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. * फ्लूवरील उपचारांना प्रयोगशाळा तपासण्यांची गरज नाही. * डॉक्टरी सल्ल्याने औषध सुरू करण्याबरोबर दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात मीठ-हळद टाकून गुळण्या करा. गरम पाण्याची वाफही घ्या, तसेच विश्रांती आवश्यक. * सर्वानी तोंडावर मास्क वापरण्याची गरज नाही. सामान्य व्यक्तींसाठी चार पदरी हातरूमाल पुरेसा असतो. दोन दिवसांत वैद्यकीय सल्ल्याने ‘टॅमी फ्लू’ सुरू करणे इष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूत बदल होणे हे त्याचे वैशिष्टय़ असून त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत ‘इन्फ्लूएन्झा’सदृश लक्षणे अजिबात अंगावर न काढता लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध सुरू करणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता किंवा इतर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. स्वाईन फ्लूवरील ‘ऑसेलटॅमीविर’ (टॅमी फ्लू) हे औषध लक्षणे दिसू लागल्यावर ४८ तासांत सुरू केल्यास त्याची परिणामकारकता अधिक असते. त्यामुळे विषाणू पेशींमध्ये शिरून वाढण्यापूर्वीच त्याला आळा घालून पुढील गुंतागुंती टाळणे शक्य होते. -डॉ. प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग