आता ३१ जुलैऐवजी ३० सप्टेंबर मानीव दिनांक शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी आता ३१ जुलै ऐवजी ३० सप्टेंबर हा मानीव दिनांक गृहीत धरण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय परवा २५ जानेवारी रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव बबन माळी यांनी जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय निश्चित करण्याची पद्धत बदलणार असून त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या राजपत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ जून २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अनुसार ६ वष्रे पूर्ण झालेल्या कोणत्याही बालकास मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र, प्रचलित तरतुदीनुसार यापुढेही ५ वर्ष पूर्ण केलेल्या बालकास इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देता येईल व असे बालक मोफत व सक्तीच्या शिक्षणास पात्र राहील. आणि अंगणवाडी, बालवाडी, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी ३१ जुलै हा मानीव दिनांक गृहीत धरण्यात आला असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद केले होते. यानंतर २१ जानेवारी २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये व लगेचच काढण्यात आलेल्या शुध्दिपत्रकान्वये ११ जून २०१० च्या शासन निर्णयामधील शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय यासंदर्भात असणारी तरतूद वगळण्यात आली. आणि ३१ जुलै ही मानीव दिनांक गृहीत धरून सन २०१६-१७ साठी पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षांंहून अधिक व पहिलीसाठी ५ वष्रे पूर्ण असे करण्यात आले. याचबरोबर पहिलीच्या प्रवेशासाठी पाल्याचे वय सन २०१७-१८ साठी ५ वष्रे व ४ महिने पूर्ण, २०१८-१९ साठी ५ वष्रे व ८ महिने पूर्ण तर, २०१९-२० साठी ६ वष्रे पूर्ण असावीत अशी वयांची अट अंमलबजावणीसाठी जारी करण्यात आली. तर, नुकत्याच २५ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार २१ जानेवारी २०१५ चा शासन निर्णय व २३ जानेवारी २०१५ च्या शुध्दिपत्रकान्वये शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयात परिच्छेद क्र. २ मधील पूर्व प्राथमिक तक्त्यातील मानीव दिनांक हा ३१ जुलै घोषित करण्यात आलेला आहे. यामध्ये ३० सप्टेंबर अशी सुधारणा शासनाने सदर निर्णयाने केली आहे. यापुढे प्रवेश देताना, सर्व शाळांनी ३० सप्टेंबर हा मानीव दिनांक गृहीत धरून मुलांचे वय निश्चित करावयाचे आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०१७०१२५१७३९१२३४२१ असा आहे.