सिन्नर-शिर्डी मार्गावर वावीजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जण ठार झाले. हे सर्व जण मुंबईतील भाईंदर येथील रहिवासी आहेत. चौरसिया कुटुंबातील सदस्य मुंबईहून शिर्डीकडे जात असताना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वावीजवळ त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसली. पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले. जखमींना त्वरित सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असताना प्रशांत बाळकृष्ण करंजे (३२,चालक), रुक्मिणी मनबोधप्रसाद चौरसिया (५५), तनिष्क वीरेंद्र चौरसिया (३ महिने), फुलमती गणेशप्रसाद चौरसिया (४७), बेबी वीरेंद्र चौरसिया (२६) या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.