महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंग प्रकारांवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. रॅगिंग करणाऱ्यांना पाच वर्षे प्रवेशबंदीला सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी येथे ही माहिती दिली.
महाविद्यालयांत होणाऱ्या रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने रॅगिंग करणाऱ्यांना पाच वर्षे प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वायकर म्हणाले. रॅगिंगच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. २८ सरकारी महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्याचे आदेशही वायकर यांनी दिले. याशिवाय महाविद्यालयात रॅिगगचा प्रकार आढळल्यास, विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित संस्थेतील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा राज्यमंत्र्यांनी दिला. आगामी काळात रॅिगगमुळे कोणाचाही बळी जाऊ नये, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.