जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम असून, मानवत तालुक्यातील आंबेटाकळी येथील माणिक बादाड (वय ५५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. जिल्ह्यात उष्माघाताचा हा पहिलाच बळी असून, गेल्या तीन दिवसांपासून वाढलेले तापमान गुरुवारीही कायम राहिले.मंगळवारी परभणीचे तापमान ४५.५ अंशांवर पोहोचले होते. गेल्या पाच वर्षांतील तापमानाचा हा उच्चांक आहे. बुधवारी, गुरुवारी हीच स्थिती कायम राहिल्याने सुनसान रस्ते, रिकाम्या बाजारपेठा असे चित्र होते. दरम्यान, कडक उन्हाच्या धास्तीने दुपारनंतर घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. भरदुपारी रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. रस्त्यावरची रहदारी पूर्ण थांबली आहे. दिवसभर रस्त्यावर दिसणारा शुकशुकाट सायंकाळी गर्दीत बदलत आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आदी ठिकाणी सायंकाळी गर्दी होत आहे. सकाळी आठ-नऊनंतर ऊन वाढत असल्याने आपली बहुतांश कामे सकाळीच आटोपण्याकडे नागरिकांचा कल जाणवत आहे.