रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळील देवकुंड धबधबा येथे अडकलेल्या ५५ विद्यार्थ्यांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने देवकुंडजवळ रविवारी ५५ विद्यार्थी अडकले होते. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. व्हॉट्स अॅपवर ट्रेकिंगची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार झाला होता. मुंबईतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी या ग्रुपमध्ये होते. या विद्यार्थ्यांनी भिरा गावातील देवकुंड धबधबा येथे पावसाळी सहलीचे आयोजन केले होते. सुमारे ५५ विद्यार्थी देवकुंड धबधब्यावर गेले होते. हे सर्व विद्यार्थी १७ ते २० वर्ष या वयोगटातील होते. रविवारी सकाळी हे सर्व जण देवकुंड धबधब्याला जाण्यासाठी मुंबईतून निघाले होते. देवकुंड धबधब्याच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे ५५ विद्यार्थी अडकून पडले. विद्यार्थी अडकल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. विद्यार्थी ज्या भागात अडकले होते त्या भागात जाण्यासाठी पोलिसांना सुमारे सात किलोमीटर पायी चालत जावे लागले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुटका झाली आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. माणगाव पोलिसांच्या सात जणांच्या पथकानेच ही मोहीम राबवली. ५५ पैकी एक विद्यार्थी पाण्यात वाहून गेला होता. सुदैवाने एका खडकाचा आधार घेत त्या विद्यार्थ्याने स्वतःचा जीव वाचवला.