भरधाव वेगात जात असलेल्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे जण जागीच तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हत्तूर गावाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. हे गाव सोलापूर-विजापूर महामार्गावर आहे. वीरेंद्र लक्ष्मण तलवार (वय ३०, रा. उरण, नवी मुंबई), नितीन शंकर बिराजदार (वय २७, रा. धुळखेड. ता इंडी. जि. विजापूर), तेजस अशोक वाडदेकर (वय २७, सिधु विहार विजापूर रोड सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मिलिंद दत्तात्रय वाघमारे (रा. सिधु विहार, विजापूर रोड, सोलापूर), आकाश सुर्यकांत गायकवाड (रा. उरण, नवी मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरातून विजापूरकडे कारमधून (एमएच ०२ सीडी ९४९६) पाचजण निघाले होते. हत्तूरजवळ एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात तीन वेळा उलटली व झाडावर जाउन आदळली. या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विजापूर नाका पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.