कादवा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू‘साखर कारखानदारीसमोर आज अनेक समस्या उभ्या आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे उसाला अधिक भाव मिळावा म्हणून मागण्या सुरू झाल्या आहेत. परंतु, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, असे सांगत उसाला योग्य भावाचा विचार सारासार व विवेकबुध्दिने व्हायला हवा,’ असे मत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्य़ातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी भुजबळ यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे आदी उपस्थित होते. साखर कारखानदारीतील अनेक अडचणींवर मात करून कादवा सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला आहे. शिवाय, या कारखान्याने परिसरातील विविध विकासाच्या आणि विस्तारीकरणाच्या योजनांची अंमलबजावणी केली. ही सहकार चळवळीला भूषणावह बाब असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीतून कादवा कारखाना संचालकांनी कर्तबगारीने चालवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला असल्याचे मधुकर पिचड सांगितले.आदिवासी जनतेचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठीच्या योजना राबविण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांची पाचगणी, महाबळेश्वर यासारख्या ठिकाणी आदिवासी विभागाने सोय केली आहे. कादवा कारखान्याच्या विस्तारीकरणात वसतीगृहासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.