समाजात घडत असलेल्या घडामोडींवर आधारित त्या त्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रसंगानुरूप शिक्षण दिले तर ते विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते. यासाठी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे शिकवावे असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी अलिबाग येथे केले. राज्यात मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली आणण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संदर्भात गेल्या वर्षभरात प्राथमिक शिक्षण स्तरावर होत असलेले बदल आणि पुढील वाटचाल या अनुषंगाने राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांची तीनदिवसीय कार्यशाळा अलिबागच्या हॉटेल फाऊंटन हेड येथे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, युनिसेफच्या प्रतिनिधी रेश्मा अग्रवाल उपस्थित होते. शिक्षणमंत्री तावडे पुढे म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विषयानुरूप त्यांचे ज्ञान वाढावे यासाठी प्रयत्न करतो. परंतु विद्यार्थ्यांना सर्वच विषयाचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण राज्यात आणले पाहिजे, तर परिपूर्ण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र होईल. विद्यार्थी हा समाजातीलच घटक आसतो. समाजातील चालू घडामोडी तो पाहत असतो. म्हणून समाजातील घडलेल्या घटनांवर आधारित अॅक्टिविटी बेस शिक्षण झाले पाहिजे. समाजातील घडलेल्या घटनांवर ज्या वेळी मुले वर्गात प्रश्न उपस्थित करतील अशा पद्धतीने मुलांना शिक्षण दिले पाहिजे. शैक्षणिक दर्जा सुधारतो तेव्हा त्याचे श्रेय त्या काळातील शिक्षणाधिकारी, प्राचार्य यांना जाते. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाधिकारी, प्राचार्य, शिक्षक यांनी स्वयंस्फूर्तीने काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शैक्षणिक प्रगत महाराष्ट्रमध्ये काम करताना कशा प्रकारे सुधारणा करण्यात आल्या, यादरम्यान कोणत्या अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली या अनुषंगाने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून माहिती घेतली. या वेळी शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र या संदर्भात तयार करण्यात आलेल्या सहा पुस्तक संचाचे प्रकाशन करण्यात आले.