पती वेळ देत नसल्याने औरंगाबादमध्ये नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने पतीला सेल्फीदेखील पाठवला होता. क्षुल्लक कारणावरुन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

औरंगाबादमधील पडेगाव येथे राहणा-या प्रवलिका तेरम मनोहर या महिलेचा महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. हे दाम्पत्य मूळचे केरळचे असून महिलेचा पती हे औरंगाबादमध्ये बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. लग्नापूर्वी वेळ देणारा पती आता पुरेसा वेळ देत नाही अशी प्रवलिकाची तक्रार होती. यावरुन पती -पत्नीमध्ये कुरबूरही सुरु होती. शुक्रवारी संध्याकाळी पती कामावर गेला असताना प्रवलिकाने आत्महत्या केली. आत्महत्या करतानाचा सेल्फीही त्याने पतीला पाठवला होता. यानंतर तिच्या पतीनेही तातडीने घराच्या दिशेने धाव घेतली. प्रवलिकाला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.