दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटानंतर प्रभास आणि अनुष्काच्या नात्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी ही जोडी खऱ्या अर्थाने ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. दोघांनीही हे सर्व खोटं म्हटलं असलं तरी या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यातच भर म्हणून आता आणखी एक गोष्ट समोर येतेय. यावर्षी डिसेंबरमध्ये प्रभास आणि अनुष्काचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘लग्नाबद्दल सध्यातरी मी काहीच विचार करत नाहीये. त्यामुळे माझ्या फिमेल फॅन्सना चिंता करण्याची गरज नाही’, असं प्रभासने याआधी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभासने म्हटलं की, ‘आमच्याबद्दल होणाऱ्या चर्चांचा परिणाम एकमेकांवर होऊ द्यायचा नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं आहे. गेल्या नऊ वर्षांपासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात चांगली मैत्री आहे. इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याने जेव्हा रिलेशनशिपच्या चर्चा ऐकू येतात, तेव्हा खरंच मी विचार करायला लागतो की आमच्यात असं काही आहे का? (हसतो) पण, असं काहीच नाहीये. यात नवीन काही नाही. एकापेक्षा अधिक चित्रपटांमध्ये जेव्हा त्याच अभिनेत्रीसोबत भूमिका साकारतो तेव्हा साहजिकच लोकांमध्ये चर्चा होऊ लागतात.’

वाचा : रितेश अमेयवर का रागावला?