मराठी चित्रपट अधूनमधून चौकटीबाहेरचे विषय साकारतो आणि आश्चर्याचा धक्कादेखिल देतो . सिध्दार्थ फिल्मचा 'आहुती' (१९९२) अगदी तसाच! त्या काळात प्रामुख्याने सामाजिक कौटुंबिक व विनोदी अशाच प्रकारचे चित्रपट निर्माण होत असताना निर्माता नितिन करंबेळकर व दिग्दर्शक कुमार सोहोनी यानी अनिरुद्ध पुनर्वसु यांच्या एका धाडसी कथेवर आधारित मराठी चित्रपट करायचे ठरवले हीच मोठी धक्कादायक बातमी होती. अनिल कालेलकरने त्या कथेवर पटकथा संवाद लिहिले. आशा परांजपे या युवतीभोवती हे कथानक होते. प्रियकराकडून फसगत आणि मग अन्य इसमाशी लग्न करताच ती गरोदर आहे हे आपणास माहित आहे असे सांगून तो तिला धक्का देतो, पण तरीही तिचा स्वीकार करीत असल्याचे तिला सांगतो. आता तिला झालेली मुलगी जरा कुठे वयात येतेय तोच तिच्या आयुष्यात तोच प्रियकर पुन्हा येतो. पुढे? 'आहुती'चे साधारण कथानक हे असे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी अशी धाडसी थीम मराठीच्या पडद्यावर येणे हेच केवढे तरी विशेष होते. अश्विनी भावेने आशा परांजपे ही आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारलीय. तिच्या काही विशेष उल्लेखनीय चित्रपटात याचे स्थान खूप वरचे. या भूमिकेसाठी तिला राज्य शासनाकडून सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कथेलाही पुरस्कार मिळाला. आणि संकलनालादेखिल (अनंत धर्माधिकारी) अन्य भूमिकेत रमेश भाटकर, मोहन आगाशे, स्मिता तळवलकर, भावना, अविनाश मसुरेकर, वैदही अमृत्ते, बेबी पूनम व यशवंत दत्त यांच्या भूमिका होत्या. जबरदस्त तगडे कलाकार हेदेखील या चित्रपटाचे विशेष होय. अशा वेगळ्याच चित्रपटाचे पोस्टरडिझाईन व बुकलेट वेगळेच असायला हवे ना? अच्युत पालव याने ते करतानाच कथेचे वेगळेपण त्यातून सूचित होईल व चित्रपटाबाबत उत्सुकता वाढेल याचेही भान ठेवले. 'आहुती'सारखा धक्कादायक कथानकावर मराठीत चित्रपट निर्माण झाल्याचे तेव्हा भरपूर कौतुक झाले. मराठीचा पारंपारिक प्रेक्षक अशाही चित्रपटाचा स्वीकार करतो हेच त्यावरून अधोरेखित झाले व तेच महत्त्वाचे असते. मराठी चित्रपट साचेबंद वाटचाल करतो असे कधीच नव्हते. पण त्यातील 'आहुती'सारख्या चौकटीबाहेरच्या चित्रपटाचे कौतुक झाले तसे इतरांचेही ( लक्ष्याची भूमिका असणारा 'माणूस') व्हायला हवे. दिलीप ठाकूर