बेगम अख्तर यांना 'मल्लिका-ए-गझल' असे म्हटले जाते. 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया..' यांसारख्या प्रसिद्ध गझलांना बेगम अख्तर यांच्या स्वरांची साथ मिळाली आहे. अशा या 'मल्लिका-ए-गजल'ला गुगलने डुडलद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. वाचा : अंतराळात उडल्यावर कॅन्सरशी लढणार सुशांत सिंग राजपूत बेगम अख्तर यांची आज १०३ वी जयंती आहे. अख्तरी बाई फैजाबादी असे मूळ नाव असलेल्या बेगम अख्तर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला. दादरा, ठुमरी व गजल या संगीत प्रकारांमध्ये त्या निष्णात होत्या. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने आधी पद्मश्री आणि १९७५ साली मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. एकदा एका मुलाखतीत बेगम अख्तर यांच्या स्मृतीला उजाळा देताना पं. जसराज म्हणालेले की, 'वयाच्या चौथ्या वर्षी हैदराबाद येथे एका फूटपाथजवळून जात होतो. चहा आणि पाव मिळणारे छोटेसे टपरीवजा हॉटेल होते. ‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, वरना कही तकदीर तमाशा ना बना दे’ ही बेगम अख्तर यांच्या गजलची रेकॉर्ड तेथे लागलेली असायची. अख्तरीबाईंच्या त्या आर्त सुरांनी मी संगीताकडे ओढला गेलो. पण, तबलावादक आणि गायक होईन की नाही, हे माहीत नसले तरी ‘दिवाना बनाना है’ हे सूर ऐकण्यासाठी मी सतत तेथे फूटपाथसमोर जायचो. ती टपरी हीच माझी पहिली संगीत शाळा होती..' वाचा : सीए ते मिसेस इंडिया पर्णिता तांदुळवाडकरचा प्रवास शकील बदायुनी यांच्या ' मेरा अज्म इतना बुलंद है कि पराये शोलों का डर नहीं, मुझे खौफ आतिश ए गुल से है ये कही चमन को जला न दें..' या अद्वितीय गजलेला बेगम अख्तर यांचा स्वर लाभलेला आहे. आपल्या जादुई आवाजाने संगीत श्रोत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या 'मल्लिका-ए-गजल'ने ३० ऑक्टोबर १९७४ रोजी जगाचा निरोप घेतला.