दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना नुकताच मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मात्र के. विश्वनाथ यांना वेगळ्याच शैलीत शुभेच्छा दिल्या. रामूने के. विश्वनाथ यांना शुभेच्छा देत काही उपरोधिक ट्विट करत दादासाहेब फाळके पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देण्यापेक्षा के. विश्वनाथ यांच्या नावे दादासाहेब फाळकेंना पुरस्कार द्यायला हवा होता असं रामूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं. सर्वप्रथम तेलगुमध्ये ट्विट करत रामूने त्याचं मत मांडलं. त्यानंतर करण जोहरच्या चित्रपटांकडे मोर्चा वळवत त्याने दादासाहेब फाळकेंच्या चित्रपटांपेक्षा करणचे चित्रपट मला जास्त आवडतात, असंही तो म्हणाला. सद्यस्थिती पाहता ज्या दादासाहेबांच्या नावे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो त्यांनी तर दादासाहेब फाळकेंचे चित्रपट पाहिलेसुद्धा नसतील, असं म्हणत रामूने सर्वांचेच लक्ष वेधले. 'दादासाहेब फाळकेंनी जवळपास ९५ चित्रपट बनवले आहेत, पण 'केजो'च्या (करणच्या) चित्रपटांच्या तुलनेत त्यांचा एकही चित्रपट नाही. मी काही दादासाहेब फाळकेंचा अनादर करण्याच्या उद्देशाने असे म्हणत नाहीये,' असं म्हणत रामूने त्याची बाजू मांडण्याचा केला आहे. चित्रपट सृष्टीतील अनेकांनी तर दादासाहेब फाळकेंचे चित्रपट पाहिलेसुद्धा नसतील तर मग त्यांच्या नावे केवळ एखादी गोष्ट फार आधीपासून चालत आली आहे याच कारणाने पुरस्कार देणं कितपत समर्थनीय आहे असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. दरम्यान, सोमवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गजांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येतं. पुरस्कार स्वरुपात विजेत्या कलाकाराला सुवर्णकमळ, १० लाख रुपये रोख आणि शाल दिली जाते.