काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण झाले. यावेळी मोठ्या उत्साहात कपिलच्या शोमध्ये हा आनंद साजरा करण्यात आला. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलच्या विनोदी खेळीसोबतच सहकलाकारांचंही महत्त्वाचं योगदान आहे. याच सहकलाकारांचे आभार मानत कपिलने कार्यक्रम पुढे नेला. पण, या आभरप्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये कपिलने कोणत्याही कलाकाराचा नावानिशी उल्लेख केलाच नाही जी बाब अनेकांनाच खटकली.

कपिलच्या शोमध्ये ‘रिंकू भाभी’ आणि ‘डॉ. मशहूर गुलाटी’च्या धमाल विनोदी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुनील ग्रोवरचीही महत्त्वाची भूमिका आहे. पण, सुनील- कपिलच्या वादामुळे या दोन्ही कलाकारांनी वेगळ्या वाटांना जाण्याचा निर्णय घेत एकमेकांचा उल्लेख करणंही टाळलं. सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर त्याच्यामागोमाग अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनीही शोमधून काढता पाय घेतला होता. या कलाकारांच्या अनुपस्थितीचे पडसाद ‘द कपिल शर्मा शो’च्या टीआरपी रेटिंगवर उमटले. पण, या कलाकारांचं कपिलच्या शोमध्ये असणारं योगदान पाहता सोनी वाहिनीने १०० व्या भागात त्यांचे आभार मानण्याचा सल्ला कपिलला दिला होता. मुख्य म्हणजे या कलाकारांचा नावानिशी आभार मानण्याचं कपिलला सांगण्यात आलं होतं. पण, त्याने तसं काहीच केलं नाही.

शोच्या १०० व्या भागात कपिलने सुनील, अली आणि चंदनचे नाव न घेताच त्यांचे आभार मानले. ‘आज आमच्या कार्यक्रमाचा १०० वा भाग आहे. त्यानिमित्ताने मी सर्व प्रेक्षकांचे, सेलिब्रिटींचे, संपूर्ण ऑनस्टेज आणि बॅकस्टेज टीमचे आभार मानतो. त्यासोबतच जे आमच्यासोबत आहेत आणि जे आमच्यासोबत नाहीत त्यांचेही आभार…’, असं म्हणत मोजक्या शब्दांत कपिलने आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपता घेतला. त्याचं हे वागणं अनेकांनाच खटकलं. तेव्हा आता याचा कपिलच्या शोवर काही परिणाम होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर बऱ्याच सेलिब्रिटींनीही कपिलच्या शोकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं.