अभिनेते हे मोठ्या पडद्यावरील असो किंवा छोट्या, आपल्या व्यस्त कामकाजातून स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी खूप क्वचित वेळ त्यांना मिळत असतो. टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या काही कलाकारांनी आपल्या याच कामकाजामुळे हनिमूनही पुढे ढकललाय. लग्न आणि त्यानंतर हनिमूनसाठी मोठी सु्ट्टी मिळणे अशक्य असल्याने हनिमून पुढे ढकलण्यातच या कलाकारांनी समाधान मानले. टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे तर सर्वांनाच परिचित आहेत. 'ये है मोहब्बते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली दिव्यांका मागील वर्षी जुलैमध्ये विवाहबंधनात अडकली. मात्र मालिकेची लोकप्रियता आणि ती निभावत असलेल्या भूमिकेची गरज लक्षात घेता दिव्यांकाला लग्नानंतर हनिमूनसाठी मात्र सुट्टी मिळू शकली नाही. त्यामुळे लग्नाच्या पाच महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये हे जोडपं हनिमूनसाठी युरोपला गेलं. 'चंद्रकांता' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा गौरव खन्ना, आकांक्षा चमोलासोबत मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध झाला. लग्नानंतर लगेच 'चंद्रकांता' मालिकेसाठी विचारणा करण्यात आल्याने पंधरा दिवसांतच गौरव चित्रीकरणात व्यस्त झाला. त्यामुळे दोघेही अद्याप हनिमूनला गेलेच नाहीच. अभिनेत्री हुनर हाली ऑगस्ट २०१६ मध्ये अभिनेता मयांक गांधीसोबत विवाहबंधनात अडकली. मालिकेच्या चित्रीकरणासाठी हनिमूनची तारीख दोनदा बदलल्यानंतर अखेर हे दोघे मालदिव आणि दुबईला गेले. 'जमाई राजा' मालिकेतील अभिनेता रवी दुबे डिसेंबर २०१३ मध्ये अभिनेत्री सरगुन मेहतासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. त्यानंतर लगेचच 'नच बलिये'च्या पाचव्या पर्वात सहभागी होत असल्याच्या कारणाने दोघांनी आपला हनिमून पुढे ढकलला. नंतर २०१४ मधील एप्रिल महिन्यात या दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढला. वाचा : या पाकिस्तानी अभिनेत्रीने व्यक्त केलं तिचं भारतावरील प्रेम 'ये है मोहब्बते' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण पटेल मे २०१५ मध्ये अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत विवाहबद्ध झाला. मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने करण आणि अंकिता लग्नाच्या एक वर्षानंतर म्हणजेच जुलै २०१६ मध्ये हनिमूनसाठी लंडनला गेले.