अंकितला प्राचीचं ऑफीस जॉईन केल्याच्या दोनच महिन्यांत धक्का बसला होता. अंकितच डिपार्टमेंट आता थेट नवी मुंबईला ट्रान्सफर होणार होतं. नवी मुंबई अप-डाऊन करण्यापेक्षा अंकितला प्राचीहून आता दूर जाण्याचं जास्त वाईट वाटलं. कारण जिच्यासाठी आपण आधीचं ऑफीस सोडून नवं ऑफीस जाईन केलं. तिच्यासोबत केवळ दोन महिन्यांच्या सोबतीनंतर दोघंही पुन्हा आता दूर जाणार होते. "अंकित तूझं डिपार्टमेंट नवी मुंबईला ट्रान्सफर झाल्यामुळे तू किती डिप्रेस झाला होतास. मला अजून आठवतयं तू जेवलाही नव्हतास त्यादिवशी. मग आपला ऑफीस मधला शेवटचा दिवस म्हणून आपण थोडं उशीरा घरी निघालो होतो. तूझा पाय निघतचं नव्हता ऑफीसमधून.. मी तूझ्या एक्स्टेंशनवर फोन करून वैतागले होते." वाचा - लग्नाचं माप ओलांडण्याआधी.. (भाग- १) "हो, आठवतय मला..त्यावेळी मला माझ्या पीसीसमोर काम नसतानाही खूप वेळ सहज बसून राहायचं होतं. कारण मला काहीच कळत नव्हतं. अनपेक्षित धक्का बसलं की असचं होतं माझं. जसा तू दिलास नंतर.." दोघंही मोबाईलवर बोलता बोलता शांतच झाले. कुणी काहीच बोलेना. मग अंकितनेच विचारलं. "हॅलो..प्राची. आहेस का?..बोल ना..काय झालं..शांत का झालीस? (समोरून काहीच रिप्लाय येत नव्हता.) अगं बोल की..(अंकित थोडं ताणून म्हणाला.) "हममम..ऐकतेय मी बोल.." "अगं शांत का झालीस? मला वाटलं फोन ठेवलास" "आता हे पण तूच विचार मला.शांत का झाली ते." "जाऊ दे प्राची..सोड ते. तुला आज आपल्या सगळ्या आठवणींना ताजं करायचं आहे ना..मग त्यावरच बोलू." "हममम.." (प्राचीचा रिप्लाय) आता अंकित प्राचीला बोलतं करण्यासाठी आठवणींना उजाळा देत होता. "प्राची..ऑफीसमधून निघाल्यानंतर तो आईस्क्रीमवाला.जो आपल्याला पाहिलं की लगेच तुझ्यासाठी स्ट्रॉबेरी आणि माझ्यासाठी काजूकिशमिश आईस्क्रिम काढून द्यायचा..आपल्याला सांगावं ही लागायचं नाही त्याला. आईस्क्रिम खात आपण ऑटोपेक्षा चालत चालत स्टेशनला जायचो." "हमम..तुझ्यासोबतच्या गप्पांमुळे पटकन स्टेशनला पोहोचायचो..असं नेहमी फिल व्हायचं. पण स्टेशनमधलं आणि आपल्यातही अंतर नंतर वाढलं" (प्राचीचा सूर नरमला होता.) "प्राची जे व्हायचं होतं ते होणारचं होतं..त्यामुळे यावर आपण न बोलललं बरं." अंकितच्या रिप्लायनंतर प्राचीनेही वेळीच विषय बदलला. "अंकित..पण तू दिलेलं बर्थ डे सरप्राईजपण मला खूप आवडलं होतं..तू किती छान बुके पाठवला होतास..आणि तेही न सांगता" अंकितने प्राचीच्या वाढदिवसाला देखील सरप्राईज दिलं होतं. अगदी तिच्या आवडत्या स्टाईलमध्ये. अंकितने छान मोठा बुके प्राचीच्या घरच्या पत्त्यावर पाठवून दिला होता. अगदी सकाळी. प्राची उठली देखील नव्हती आणि बुके वाल्यानं प्राचीच्या आईकडे बुके दिला होता. प्राचीच्या घरच्यांना धक्काच बसला होता. कारण, प्राचीसाठी असं कोणीतरी पहिल्यांदा केलं होतं. बुकेवर अंकितने प्राचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, पण मुद्दाम खाली नाव लिहीलं नव्हतं. म्हणून प्राचीचे आई-वडिल देखील गोंधळात पडले होते. मग घरच्यांनी प्राचीला ताबडतोब उठवून तिच्यासाठी कोणीतरी बुके पाठवलाय हे सांगण्यासाठी झोपेतून उठवलं होतं. प्राचीलाही झोपेतून उठल्यावर समोर छान फुलांच्या बुकेचं सरप्राईज मिळालं होतं. ''अगं कोणी पाठवलंय हे?'' असे सारखं घरच्यांनी विचारणं सुरू केलं होतं. पण प्राचीने बुके पाहताच क्षणी तो अंकितने पाठवल्याचं ओळखलं होतं. तिच्या चेहऱयावरच्या स्मित हास्यानेच ते कळलं होतं. तिने घरातून ऑफीससाठी निघाल्यानंतर पहिला अंकितला फोन केला होता.. "अंकित..थँक्स वन्स अगेन फॉर ब्युटीफूल सरप्राईज" अंकितनेही ''ऑल वेज वेलकम'' म्हणत तिला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादिवशी दोघांनी एकत्र डिनर देखील केलं होतं.या आठवणी ताज्या होत असताना आता हळूहळू अंकितला प्राचीसोबतचा प्रत्येक क्षण आठवत होता आणि जुन्या आठवणींचा हा आढावा आता अंकितला त्रासदायक ठरू लागला होता. अंकितने शेवटी फोनवर राग व्यक्त केलाचं.. "प्राची..प्लीज थांबव हे सगळं..मला त्रास होतोय आता. का तू जुन्या आठवणी ताज्या करतेयस..तेही आज. मी आजवर दिलेले सरप्राईज तुला आवडले, पण तू मला दिलेलं सरप्राईज खूप जिव्हारी लागलंय माझ्या..इव्हन आपल्या दोघांनाही" अंकितचं हे बोलणं ऐकून प्राचीचे डोळे पाणावले. "अंकित..नशीब तू शेवटी..इव्हन आपल्या दोघांना..असं म्हणून तरी ओळखलंस की तुझ्याप्रमाणे मलाही त्रास होतोय ते.." प्राची आज अंकितशी मनसोक्त दोघांच्या जुन्या आठवणींना फुंकर घालत होती कारण तो दिवस तिच्यासाठी अंकितसोबतचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून तिचं नवं आयुष्य सुरू होणार होतं. प्राचीचं दुसऱया दिवशी लग्न होतं.. अंकितलाही ते ठावूक होतं.म्हणूनच त्याला याचा जास्त त्रास होत होता. महिन्याभरापूर्वीच प्राचीच लग्न ठरवण्यात आलं होतं आणि लग्नाच्या आधल्या रात्री प्राची अंकितसोबत फोनवर बोलत होती. अंकितनेही प्राचीला न टाळता तिचा फोन उचलला होता आणि हे सर्व संभाषण सुरू होतं. चेहऱयावर नेहमी हसू आणणाऱया अंकितसोबतच्या आठवणी या टप्प्यावर प्राचीला ताज्या कराव्याशा वाटत होत्या. त्या छान आठवणींमुळे पु्न्हा एकदा..थोड्या वेळासाठी का होईना..चेहऱयावर आनंद येईल..या उद्देशाने ती फोनवर रडत बसण्यापेक्षा आजवरच्या आठवणी अंकितला सांगत.सर्व नॉर्मल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. पण अखेरीस दोघांचेही डोळे पाणावले होतेच. दोघांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात होऊ शकलं नव्हतं. त्यासाठीच्या कारणांवर दोघांनाही आता चर्चा करायची नव्हती. कारण..वेळ निघून गेली होती. प्राचीला अंकितच्या भविष्याची.आणि अंकितला प्राचीच्या सुखाची चिंता झोपू देत नव्हती.कारण उजाडल्यानंतर त्यादिवशी अंकितचं काळीज आणि लग्नाचं माप ओलांडण्याआधी प्राचीचे पाय थरथर कापणार असल्याचं शंभर टक्के निश्चित होतं.. समाप्त. - तीन फुल्या, तीन बदाम © सर्व हक्क सुरक्षित