राज्यात आणि महापालिकेतही भाजप सत्तेत असताना कुलाबा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार व प्रतोद राज पुरोहित यांना आंदोलनाचा मार्ग अनुसरावा लागत आहे. या विभागात पाणी माफियांचा सुळसुळाट असून सुमारे दोन लाख झोपडपट्टीवासियांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात धरणे धरले जाणार आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून आणि महापालिका आयुक्त व प्रशासनाकडून हा प्रश्न सोडविला जात नसल्याने सत्ताधारी आमदारालाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.मंत्रालय आणि विधिमंडळापासून नजीक असलेल्या या परिसरात सुमारे ७५ हजार झोपडपट्टीवासियांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे व काहींना नळ जोडण्याही नाहीत. पाणीमाफियांच्या सुळसुळाटामुळे पाण्याची विक्री होत असून सार्वजनिक शौचालय चालविणाऱ्या दांडगटांकडून पाण्याचा वापर केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या विभागात पुरेसे पाणी उपलब्ध करून देत नाहीत. यासाठी महापालिका प्रशासन, आयुक्त आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊनही हा प्रश्न सुटला नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे पुरोहित म्हणाले.