कांदिवली पोलीस ठाण्यात पोलिसांनी एका जोडप्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार एकाने केली आहे. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याने दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्याला भेट देत असल्याने या दाम्पत्याला पोलिसांनी हुसकावून लावण्यासाठी त्यांना मारहाण केल्याचा दावा तक्रारकर्त्यांने केला आहे. आपण या मारहाणीच्या तक्रारीचा अर्जही पोलीसांना दिला असल्याचा दावा या व्यक्तीने केला असून पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
राकेश शेट्टी असे या तक्रारकर्त्यांचे नाव असून ११ मेच्या रात्री कांदिवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. काही कामानिमित्त पोलीस ठाण्यात आलो असता, मोबाईल चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला पोलीस दाद देत नसल्याचे आपण पाहिले, दाम्पत्याने तक्रार नोंदविण्यास सांगितले तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची शेट्टी याने म्हटले आहे.