‘गरज तेथे तातडीने रक्त’ पुरवण्याच्या योजनेची अंमलबजावणीच नाही रुग्णांना रक्तासाठी वणवण करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजना आखली. मात्र प्रशासन आणि रुग्णालय यांच्या दिरंगाईमुळे या योजनेंतर्गत मुंबईत उभी राहणारी आठ रक्त साठवणूक केंद्रे आजही कागदावरच आहेत. यामुळे शासनाने इच्छितस्थळी रक्त मिळण्याचे मुंबईकरांना दाखविलेले स्वप्न हवेतच विरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) ही योजना आरोग्य विभागाने जानेवारी २०१४ला राज्यभरात सुरू केली. ‘१०४’ या दूरध्वनी क्रमांकावर रुग्णालयांनी संपर्क साधला असता तासाभराच्या आत थेट रुग्णालयात रक्त पुरविण्याची सुविधा या योजनेंतर्गत देण्यात येणार होती. याची सुरुवात भायखळा येथील जे. जे. महानगर रक्तपेढीपासून करण्यात आली. मात्र पश्चिम भागात अंधेरीपर्यंत, मध्य भागात शीवपर्यंत आणि पूर्वेकडे चेंबूपर्यंतच ही सेवा मर्यादित राहिली. त्यानंतर या योजनेच्या विस्तारासाठी मुंबईत आठ ठिकाणी रक्त साठवणूक केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय झाला. यानुसार मुंबईतील के. बी. भाभा रुग्णालय (कुर्ला), व्ही. एन. देसाई रुग्णालय (सांताक्रूझ), शताब्दी रुग्णालय (कांदिवली), ई.एस.आय. रुग्णालय (मुलुंड), मालवणी उपजिल्हा रुग्णालय (मालाड), महानगरपालिका रुग्णालय (वसई), रेल्वे रुग्णालय (भायखळा), बीपीटी रुग्णालय (वडाळा) या रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. या रुग्णालय प्रशासनाने संबंधित केंद्रासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवून केंद्रे सुरू करणे अपेक्षित होते. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील परवानग्यांसाठी त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र यातील एकाही रुग्णालयाने आवश्यक त्या सर्व परवानग्या अद्याप मिळवलेल्या नाहीत. यामुळे ही केंद्रे उभी राहू शकलेली नाहीत. रुग्णांना आर्थिक भरुदड शासकीय रक्तपेढय़ांमध्ये रक्ताची पिशवी ही ८५० रुपयांना मिळते तर खासगी रक्तपेढय़ा याच्या दुप्पट म्हणजे एका रक्त पिशवीसाठी १४५० शुल्क घेतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना गरजेचे वेळी जे. जे. महानगर किंवा पालिकेच्या रक्तपेढय़ांकडे धाव घ्यावी लागते. जे.जे. महानगरची रक्तपेढी ही दक्षिण मुंबईत असल्याने मुंबईच्या इतर भागांमधील रुग्णांना त्वरित रक्त मिळवण्यासाठी परवडत नसले तरी खासगी रक्तपेढय़ांमधून रक्त घेणे भाग पडते. अडथळे कुठे? * केंद्रांची नियुक्ती झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत अन्न व औषध प्रशासनाकडे जागा मान्यतेचा प्रस्ताव पाठवणे बंधनकारक आहे. परंतु दोन केंद्रांनी प्रस्ताव सादर केलेला नाही. * काही केंद्रांच्या जागांचे नकाशे मंजूर झाले आहेत मात्र केंद्र कार्यरत करण्यासाठी तंत्रज्ञांच्या जागा भरलेल्या नाहीत. रेल्वे रुग्णालय (भायखळा), बीपीटी रुग्णालय (वडाळा) या रुग्णालयांमध्ये रक्त साठवणूक केंद्र हे आधीपासूनच सुरू आहेत. परंतु तंत्रज्ञांची नेमणूक न झाल्यामुळे ही केंद्रे जीवन अमृत सेवेअंतर्गत आणली गेली नाहीत. * रक्ताची साठवणूक, ने-आण करण्यासाठीची साधने तसेच तपासणीसाठीची यंत्रे अशी यंत्रसामग्री मात्र वर्षभरापूर्वीच या केंद्रांच्या संबधित रुग्णालयांना पुरविण्यात आली आहे. याशिवाय अजून यंत्र सामग्रीच्या निविदा काढण्याचे काम सुरू आहे. केंद्राची उभारणी करण्यासाठी संबंधित रुग्णालयांचाही प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी २७ तंत्रज्ञांची जाहिरात आम्ही दिली होती. परंतु मुलाखतीसाठी नांदेड, कोल्हापूर अशा लांबच्या भागांतून उमेदवार आले होते. तंत्रज्ञाला महिना दहा हजार वेतन नियोजित आहे. त्यामुळे बाहेरचे उमेदवार इथे काम करण्यास इच्छुक नाहीत. नव्याने देण्यात आलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून चार तंत्रज्ञ रुजू झाले आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञांच्या नियुक्तीबाबत काही फेरबदल करता येतील का याचा आम्ही विचार करत आहेत. वसई आणि मालाडच्या केंद्रांचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुढच्याच महिन्यामध्ये ही केंद्रे सुरू होतील. - डॉ. अरुण थोरात, सहायक संचालक राज्य रक्त संक्रमण परिषद