मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे निवृत्त लष्करी अधिकारी

कोल्हापूरमधील एका छोटय़ाशा गल्लीमध्ये आमचे घर होते. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके असे साहित्य क्षेत्रातील दिग्गज आमच्या इथे राहायचे. त्यामुळे आम्हा भावंडांमध्ये साहित्य वाचनाविषयी कमालीची उत्सुकता असायची. लहानपणी मी कधीही पुस्तके खरेदी करून वाचली नाहीत; तर वाचनालयातील पुस्तके घरी आणून त्यांचे वाचन करण्याची स्पर्धा आम्हा भावंडांमध्ये लागत असे. माझे मराठी चांगले असल्याने शाळेमध्ये निबंध स्पर्धेत सातत्याने सहभागी होत असे. त्या वेळी एका स्पर्धेत बक्षीस म्हणून मला ना. सी. फडके यांचे ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हे पुस्तक मिळाले. त्या काळात साने गुरुजी, चिं. वि. जोशी यांच्यासह विविध लेखकांच्या साहित्याचे वाचन आम्ही करीत असू. अवघ्या एक ते दीड रुपये वर्गणीत पुस्तके वाचत असू. पुस्तकाचे आणि लेखकाच्या विचारांचे रसग्रहण पूर्णपणे होईपर्यंत मी निवांतपणे पण तितकेच सखोल वाचन करीत असे.

महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर, सातारा आणि त्यानंतर पुण्यामध्ये पूर्ण केले. लहानपणी इंग्रजीमधील पुस्तकांचे फारसे वाचन झाले नाही. मात्र १९६० मध्ये पुण्यामध्ये वास्तव्याला आल्यानंतर स. प. महाविद्यालयातून बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण झाले आणि मी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सैन्यामध्ये असलेल्या ३५ वर्षांच्या काळात लष्करी इतिहास, डावपेच, युद्धनीती, शस्त्रास्त्रांविषयीच्या नानाविध पुस्तकांचे वाचन केले. माझ्या वाचनप्रवासात प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाविषयीचे सर्व खंड, ‘द पाईन वॉरियर्स’, ‘शिवाजी-हिज् लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’, ‘मराठी रियासत’चे आठ खंड, ‘युद्धमीमांसा’, ‘द आर्ट ऑफ वॉर’, ‘फायटिंग टू द एंड’, ‘मराठा आरमार’ अशा नानाविध पुस्तकांचा समावेश आहे.

लष्करी सेवेत असताना नागालॅण्ड, पंजाब, जम्मू-काश्मीर, चेन्नई, सिक्कीम, मेरहठ, सिमला या ठिकाणांसह निवृत्तीनंतर श्रीलंकेमध्येही होतो. त्या कालखंडात माझ्याकडून कळत-नकळत पुस्तकांची खरेदी होत होती. लष्करी ठाणी असलेल्या ठिकाणची ग्रंथालये आणि वाचनालये प्रचंड समृद्ध आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीविषयी पुस्तके वाचण्यासाठी मी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीएमई) आवर्जून जात असे. तब्बल ३५ वष्रे लष्करामध्ये विविध पदांवर सेवा दिल्यानंतर युद्धनीती, लष्करी सराव आणि इतर अनेक गोष्टींचे मला ज्ञान अवगत होते. त्यामुळे ठिकठिकाणी व्याख्याने आणि चर्चासत्रांमधून हे ज्ञान आजच्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्यानंतर भारतासंबंधीच्या युद्धांच्या अनेक नोंदी व टिपणे मी यानिमित्ताने वाचनादरम्यान काढून ठेवली. त्यामुळे पाकिस्तान, चीन व संबंधित देशांविषयी बोलताना ते संदर्भ अत्यंत उपयोगी पडले. व्याख्याने आणि चर्चासत्रांप्रमाणे एकीकडे माझा लेखनप्रवासही सुरू झाला. कारगिलचे युद्ध सुरू असतानाच चालू परिस्थितीविषयी वर्तमानपत्रामधून लिहिण्यातून माझी लेखनाची सुरुवात झाली. याशिवाय अफगाणिस्तान, इराक यासंबंधी दीड वर्षांहून अधिक काळ ‘लोकसत्ता’सह अन्य वर्तमानपत्रांमधून लेखन करीत होतो. कारगिल युद्धाविषयी आणखी सखोल व उत्तम लेखन करावे यासाठी राजहंस प्रकाशनकडून मला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे ‘डोमेल ते कारगिल’ हे पुस्तक लिहू शकलो. त्याकरिता त्याविषयाशी केंद्रित सखोल वाचन होणे आवश्यक होते. राजकीय नीती, सामाजिक नीती आणि इतिहास याविषयी अनेक पुस्तके मी वाचून काढली. तब्बल दोन वर्षे यावर काम केल्यानंतर २००१ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. इंटरनेटच्या माध्यमातूनही वेळोवेळी वाचन सुरूच होते.

एखाद्या पुस्तकाचे विस्तृत वाचन करण्याचा मोह आजही मला आहे. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमधील पुस्तकांची संख्या मर्यादित असली, तरी मी वाचलेल्या पुस्तकांतील बारकावे आणि घटनाक्रम अगदी ठामपणे मांडू शकतो. आपण एखादे पुस्तक वाचून किती लवकर संपवितो, यापेक्षा ते पुस्तक सखोलपणे वाचून त्या लेखकाचे विचार किती समजून घेतो हे महत्त्वाचे आहे. लेखनाला वाचनातून न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक वाचकाने करायला हवा. ‘डोमेल ते कारगिल’ या पुस्तकाप्रमाणेच ‘श्रीलंकेची संघर्षगाथा’ हे पुस्तकही लिहिले. श्रीलंकेमध्ये सुरुंग निकामी करण्याच्या कामाकरिता मी निवृत्तीनंतर ‘होरायझन’ या भारतीय संस्थेच्या माध्यमातून गेलो होतो. त्या दरम्यान २००९ मध्ये प्रभाकरन् मारला गेला आणि त्यानंतर ‘श्रीलंकेची संघर्षगाथा’ हे पुस्तक लिहिले. तसेच ‘१९६२च्या युद्धानंतर’, ‘न सांगण्याजोगी गोष्ट- ६२च्या पराभवाची शोकांतिका’ हे पुस्तक  लिहिले. ‘अ‍ॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल’ या मी लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही नंतर प्रकाशित झाला.

लष्करी सेवेत असल्याने त्या काळात ललित वाचनाला मुकलो हे तितकेच खरे आहे. परंतु आता पत्नी आणि दोन्ही मुले प्रचंड वाचन करीत असल्याने पुस्तकांचा मेळा घरामध्ये दररोज भरतो. पुस्तकांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असल्याने माझ्यासह आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे बुकशेल्फ पुस्तकांनी समृद्ध आहे. आमच्याकडे ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची खरेदी होते. माझ्या बुकशेल्फमध्ये ‘मनोबोध’, ‘आव्हान- जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’, ‘१९६२ द वॉर दॅट वॉझंट’, ‘द इंडियन नेव्ही’, ‘द ब्लड टेलिग्राम’, ‘काश्मीर- एक शापित नंदनवन’, ‘कायदे आझम’, ‘ययाती’ यांसारखी अनेक पुस्तके आहेत.