लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उद्यापासून दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर येत आहेत. या भेटीमध्ये त्या मुंबईतील विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणार आहेत. खासदार किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्री वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तेथील लोकांची भेट घेत आहेत. केंद्र सरकारने गेल्या २० महिन्यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे.
सुषमा स्वराज शुक्रवारी घाटकोपरमधील लवेंडर बागमध्ये आणि शनिवारी मुलुंडमधील कालिदास कॉम्प्लेक्समध्ये उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी, तरुण, लघु उद्योजक, व्यापारी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, व्यावसायिक या सगळ्यांच्या प्रतिनिधींशी त्या संवाद साधतील, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.