नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे महावितरणच्या ग्राहकांचे एकूण ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये जमा आहेत. मात्र ही रक्कम जिल्हा बँकेने महावितरणकडे अद्यापही न भरल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा बँकेने महावितरणच्या ग्राहकांचे देयकांचे पैसे बुडवल्याचा बँकेवर आरोप आहे. याप्रकरणी नाशिक आणि मालेगाव येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. आर. शिरसाठ आणि बी. टी. कांकरिया या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक शहर मंडळ अंतर्गत महावितरणच्या ग्राहकांचे दि. १ मार्च ते ३१ मार्च २०१७ दरम्यान १३ कोटी २६ लाख १४ हजार २६२ तर १ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान ३ कोटी ९६ लाख ४२ हजार ६०५ असे एकूण १७ कोटी २२ लाख ५६ हजार ८६७ रुपये ही रक्कम बँकेकडे जमा आहे.
तर मालेगाव मंडळ अंतर्गत दि. १ मार्च ते ३१ मार्च २०१७ दरम्यान ११ कोटी ८४ लाख ४५ हजार ४९५ तर १ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान ४ कोटी १५ लाख ३५ हजार २९५ असे एकूण १५ कोटी ९९ लाख ८० हजार ७९० रुपये ही रक्कम बँकेकडे जमा आहे. जिल्हा बँकेकडे ही रक्कम एकूण ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये असून जमा असून ही रक्कम बँकेने महावितरणकडे अद्याप भरलेली नाही.
त्यामुळे महावितरण कंपनीला बँकेविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यावी लागली. जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीज बिल भरणा प्रक्रियेबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. मात्र जिल्हा बँकेने करारातील अटींचे उल्लंघन करीत मागील पावणे दोन महिन्यांपासून ग्राहकांनी त्यांच्या वीज बिलापोटी भरलेले पैसे महावितरणच्या बँक खात्यात जमाच केलेले नाहीत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणने याप्रकरणी पडताळणी करत नाशिक व मालेगाव पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.
बँकेच्या या गैरकारभारामुळे महावितरणच्या ग्राहकांनी त्यांच्या वीज बिलाची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत भरू नये, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, शहर विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांनी केले होते. तसेच वीज देयक भरणा प्रक्रियेबाबतच्या करारनाम्यातील अटींचे जिल्हा बँकेने उल्लंघन केल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला.
निश्चलनीकरणानंतर जिल्हा बँक अडचणीत सापडली असून बँकेने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप न केल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले होते. शिक्षकांचे वेतनही काही महिन्यांपासून बँक देत नसल्याने आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या घडामोडीत महावितरणच्या देयकांचे पैसेही बँकेने भरणा न करता वापरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिले भरण्यासाठी जवळील इतर पर्यायांचा वापर करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.