मनसेचा प्रयत्न पांडवलेणीच्या पायथ्याशी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारण्यात येणाऱ्या नेहरू वनौषधी उद्यानाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी शहरवासीयांसाठी ते खुले करण्याचा सत्ताधारी मनसेचा प्रयत्न आहे. या उद्यानाच्या सभोवताली सौर ऊर्जेवर आधारित इलेक्ट्रिक कुंपणासह प्रवेशद्वार व तत्सम कामे पूर्णत्वास गेली आहेत. या वैशिष्टय़पूर्ण उद्यानाद्वारे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचा दावा सत्ताधारी मनसेकडून केला जात आहे. मौजे पाथर्डी शिवारात ९३ हेक्टर जागेत साकारण्यात येणाऱ्या या उद्यानातील कामांची पाहणी बुधवारी महापौर अशोक मुर्तडक आणि स्थायी सभापती सलीम शेख यांनी केली. वन विभागाच्या अखत्यारीतील पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यानाला अत्याधुनिक स्वरूप देण्याचा संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली होती. या कामासाठी पालिकेकडे निधी नसल्याने टाटा कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून त्यासाठी तजवीज करण्यात आली. या उद्यानासाठी वन विभागाने आपली ९३.९६७ हेक्टर जागा हस्तांतरित केली. त्यानंतर नाशिक महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्यात पाच वर्षांच्या मुदतीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. उद्यानास भेट देणारा प्रत्येक जण या ठिकाणी रमेल अशी रचना केली गेली आहे. वन उद्यानाच्या सभोवताली सुरक्षिततेसाठी सौरऊर्जेवर कार्यान्वित राहणारे इलेक्ट्रिक कुंपण, फुलपाखराच्या आकाराचे अनोखे प्रवेशद्वार ही कामे पूर्णत्वास झाल्याचे मुर्तडक व शेख यांनी सांगितले. या क्षेत्रात नावीन्यपूर्ण पद्धतीने वृक्ष लागवडही करण्यात येणार आहे. या शिवाय पांडवलेणीच्या डोंगराला वळसा घालणारा आठ किलोमीटरचा सायकल मार्ग या ठिकाणी राहणार आहे. हत्तिसंग्रहालय उद्यानाचे आणखी एक वैशिष्टय़. या ठिकाणी हत्तीचे पुतळे बसविण्यासाठी सध्या खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज या ठिकाणी पर्यटकांना ऐकावयास मिळतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे शेख यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त वन उद्यान माहिती केंद्र, लाइट, साऊंड व म्युझिक शो, माहिती व मार्गदर्शक फलक आदी सर्व कामांसाठी तब्बल २३ कोटींचा खर्च होईल असा अंदाज आहे. हा सर्व निधी टाटा ट्रस्ट उपलब्ध करणार असून त्यासाठी पालिकेला कोणताही खर्च येणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. उद्यानाचे काम प्रगतिपथावर असून ते शक्य तितक्या लवकर नाशिककरांसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे मुर्तडक व शेख यांनी नमूद केले. गेल्या काही महिन्यांपासून मनसेतून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येताना मनसेने नाशिकचा चेहरामोहरा बदलविण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने हाती घेतलेली शक्य तेवढी कामे निवडणुकीआधी पूर्णत्वास जावी, असा प्रयत्न सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने महापौर व स्थायी सभापतींनी उद्यानातील कामांची पाहणी करत आढावा घेतला. पालिका निवडणुकीला सामोरे जाताना केलेली कामे दृश्य स्वलरूपात नागरिकांसमोर यावी अशी धडपड मनसेने सुरू केली आहे.