‘आयसिस’च्या जगभरातील दहशती कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले.
नवी मुंबई आयुक्त परिमंडळ-१ च्या वतीने वाशी येथे झालेल्या दहशतवादविरोधी सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, देशातील अल्पसंख्याक मुस्लीम धर्मीयांची या देशावरची अभंग निष्ठा आयसिसला यशस्वी होऊ देणार नाही.
दहशतवादविरोधी सप्ताह येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याचा मानसही फणसळकर यांनी या वेळी व्यक्त केला.
दहशतवादाची लढाई ही केवळ दहशतवाद पोलीस पथकाची नाही. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या मानसिक बळावरच दहशतवादाची पाळेमुळे उखडून फेकणे शक्य होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही नागरिक वैयक्तिक वादातून दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयात फोन करून रेल्वे स्थानक आणि विमानतळ वा विमानात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देतात; परंतु त्यामुळे इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दहशतवादी कारवायांची खोटी माहिती देणारे दूरध्वनी करणे हा टिंगलीचा विषय नाही. नागरिकांनी याबद्दल परिसरातील लोकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे सांगितले.