पुण्याहून मुंबईला येताना द्रुतगती महामार्गावर शनिवारी दुपारी पावणेतीन वाजता मारुती व्हॅगनर मोटारीचे पुढचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातामध्ये ठाणे येथील बाळकूम परिसरात राहणाऱ्या तीन महिला ठार झाल्या.
एमएच ०४ एफ ए ३५५८ ही मोटार मुंबईकडे येत असताना पनवेलजवळील रिस गावानजीक या मोटारीचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या अपघातामध्ये हिराबाई गोपाळ कदम (वय ७०), मनीषा शिवाजी कदम (वय ५०) आणि जयश्री मंगेश कदम (वय ४०) या जागीच ठार झाल्या. तसेच या अपघातात अदिती कदम (वय १५), रितेश कदम (वय १४), वेदांत कदम (वय ११) ही मुले जखमी झाली.
या मोटारीचा चालक रोनीश कदम हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातातील सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
या मोटारीत चालकासह पाच आसन क्षमता असताना सात जण बसून प्रवास करत होते. मोटारीचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकाजवळील बागेत जाऊन आपटली आणि हा अपघात झाला.