सध्या पुण्याच्या मावळ परिसरात चोरीच्या आणि दरोड्याच्या घटनांनी मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटना ताज्या असतानाच गुरूवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. काल मध्यरात्री काळोखे कुटुंब चारचाकी वाहनातून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी नायडूनगर ते माळवाडी दरम्यानच्या परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेत कुटुंबातील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून पत्नीच्या डाव्या हाताची चार बोटे तुटली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळोखे कुटुंबीय काल रात्री १२.१५ च्या सुमारास त्यांच्या गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर या दोघांनी अचानकपणे तलवार आणि काठीने महेंद्र काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी आपल्या पतीचा बचाव करण्यासाठी राणी काळोखे यांनी स्वत:चा हात मध्ये टाकला. तेव्हा तलवारीच्या घावाने राणी काळोखे यांच्या हाताची चार बोटे तुटली. तर महेंद्र काळोखेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत महेंद्र आणि राणी काळोखे यांचा मुलगा सुखरूप बचावला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सध्या देहूरोड पोलीस करत आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांत सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे मावळ परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत मावळ आणि लोणावळा परिसरात आठ हत्या झाल्या आहेत. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एप्रिल महिन्यातील मावळ आणि लोणावळा परिसरातील हत्या
या महिन्याच्या सुरुवातीला ३ एप्रिलला लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्य़ार्थी आणि विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये श्रुती डुंबरे (२१) आणि सार्थक दिलीप वाघचौरे (२२) या दोन विद्यार्थांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे विवस्त्र अवस्थेत आढळले होते. अज्ञाताविरोधात लोणावळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप ग्रामीण पोलिसांच्या हाती आरोपीविषयी कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.

२० एप्रिलला तळेगाव दाभाडे येथील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. या घटनेत महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. हत्येनंतर तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२३ एप्रिलला सांगवडे येथील महिला सरपंचच्या पतीची हत्या झाली होती. मावळ तालुक्यातील सांगवडे गावात नवनाथ लिमण (३२) याला लाकडी दांडक्याने मारहाण करत तलवारीचे वार करुन त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.