पुण्यात उरुळीकांचनला ‘पायलट’ प्रकल्प वाळवंटी भागात जनावरांसाठी चारा पीक म्हणून निवडुंग वापरता येईल का, यासाठी पुण्यातील उरुळीकांचनमध्ये एक ‘पायलट’ प्रकल्प सुरू असून बकऱ्यांना चारा म्हणून या निवडुंगाचा प्रयोगही करण्यात आला आहे. ‘नाबार्ड’च्या सहकार्याने ‘बायफ’ या संस्थेने उरुळीकांचनमध्ये एक एकरावर चाऱ्याचा निवडुंग लावला आहे. याच प्रकारचे पायलट प्रकल्प संस्थेतर्फे राजस्थानमधील बारमेर आणि गुजरातमधील कच्छ जिल्ह्य़ातही सुरू करण्यात आले आहेत. ‘बायफ’च्या ४९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या विविध प्रकल्पांसंबंधी उरुळीकांचन येथे शेतकऱ्यांसाठी माहितीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संस्थेचे संशोधन संचालक डॉ. जयंत खडसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. डॉ. खडसे म्हणाले, ‘‘संस्थेतर्फे विविध प्रकारच्या चारापिकांवर संशोधन करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नाही तिथे चारा पीक म्हणून निवडुंगाचा वापर होऊ शकेल. उरुळीकांचन येथे एक एकर जागेवर ‘थॉर्नलेस कॅक्टस’ प्रकारातील निवडुंगाचे चारा पीक लावण्यात आले आहे. राजस्थान व गुजरातमध्येही एक वर्षांपासून पायलट प्रकल्प सुरू आहे. पुढे या प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना निवडुंगाचे चारा पीक घेण्यासाठीचे तंत्रज्ञान देऊन मार्गदर्शन करता येऊ शकेल.’’ या निवडुंगाची लागवड पान लावून होते व त्यासाठी माळावरील खडकाळ जमीनही पुरते. ताजे पान १५ दिवस सावलीत वाळवून त्यातील पाणी कमी झाल्यावर जमिनीत लावले जाते. ही लागवड पावसाळ्यानंतर केली जाते. पहिल्या वर्षी त्याला ७ ते ८ पाने येतात. ‘जनावरांमध्ये निवडुंगाच्या घेतलेल्या ‘फीडिंग ट्रायल’मध्ये ताज्या पानांचे बारीक तुकडे करून शेळ्यांना खाऊ घातले गेले व शेळ्यांनीही ते आवडीने खाल्ले,’ अशी माहिती संस्थेचे डॉ. विठ्ठल कौठाळे यांनी दिली.