के.बी. महाविद्यालयामध्ये महिला दिन मोठय़ा उत्साहात पार पडला. के.बी. महाविद्यालय हे महिला महाविद्यालय असल्याने या दिवसाचा आनंद काही वेगळाच होता. महिला दिनाचे औचित्य साधून ‘स्त्रियांवरील अत्याचार’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रा. रेणू त्रिवेदी यांनी निर्भया प्रकरणाचे मागोवा घेत अतिशय संवेदनशील विषयाने कार्यक्रमाची सुरुवात केली. महिलांचे सशक्तीकरण आवश्यक आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्रीबद्दल आदर निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे विचार या चर्चासत्रात मांडण्यात आले. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला तसेच महिलांचे साहित्य, कला, चित्रपटाद्वारे केलेले दर्शन यांवर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांचे विचार विद्यार्थ्यांजवळ मांडले. इंग्रजी वाड्मयाद्वारे स्त्रीविषयी दुर्बलता या विषयावर प्रा. जगदीश मगर यांनी व्याख्यान दिले. प्रा. राजे यांनी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले, तर प्रा.वैशाली गरकल यांनी चित्रपटाद्वारे व्यक्त झालेल्या स्त्री व्यक्तिमत्त्वाचे संकेत या विषयावर भाष्य केले. यंदाच्या वर्षीचा महिला दिन विविध विषयांवर दृष्टिक्षेप टाकणारा होता, असे मत महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी यावेळी व्यक्त केले.